मुंबई - विल्सन आजारामुळे वाराणसीहून उपचारांसाठी मुंबईत आलेल्या यश सिंह या 17 वर्षीय मुलासाठी आता आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला आहे. टिळक रुग्णालयात अंथरुणाला खिळलेल्या यशवरील उपचारांसाठी दोन दिवसांत तब्बल नऊ हजार नऊशे रुपयांचे धनादेश टिळक रुग्णालयाकडे जमा झाले.
यशवर उपचार झाले नाहीत, तर त्याला जन्मभर अंथरुणाला खिळावे लागेल. त्यामुळे त्याची आई वरुणा सिंह यांनी चक्क भीक मागूनच मुलावर उपचार सुरू केले. बिकट परिस्थितीमुळे यशच्या उपचारांत खंड पडून तो मरणाच्या दारात पोचला होता. याबाबतच्या बातम्या "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच जनमानस हेलावले. यशला नवे जीवन देण्यासाठी सर्वसामान्यांनी पुढाकार घेत टिळक रुग्णालयाला आर्थिक मदत देऊ केली. 500 रुपयांपासून पाच हजार रुपयांचे धनादेश टिळक रुग्णालयाला जमा झाले आहेत.
यशची मरणासन्न अवस्था पाहता त्याला उपचारांसाठी दर महिन्याला तब्बल 45 हजारांच्या मदतीची गरज आहे. त्यापैकी 25 हजार खर्च केवळ यशच्या गोळ्यांचा आहे. पैशांअभावी यशच्या आईला हा खर्च परवडला नाही. परिस्थितीला कंटाळलेल्या यशने "आई, मला मरू दे, आपले जगात कोणीही नाही', असे तिला सांगितले. परंतु, हार न मानता या मातेने पैशांची भीक मागत महिन्याभरापूर्वी मुंबईतील टिळक रुग्णालय गाठले.
यश उपचारांना चांगला प्रतिसाद देत असला, तरीही टिळक रुग्णालय दर दिवसाचा यशच्या उपचारांचा केवळ 50 टक्केच खर्च उचलत आहे. नोकरी सुटल्याने यशच्या आईवर ही भीक मागण्याची वेळ आली आहे. मदतीसाठी लोकांनी दिलेल्या रकमेतून यशच्या औषधांचा खर्च प्राधान्याने पूर्ण केला जाईल, अशी माहिती टिळक रुग्णालय प्रशासनाने दिली.
यशला मदत करणाऱ्यांची मी आभारी आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. परंतु, उपचारांत सातत्य राहण्यासाठी प्रत्येक महिन्याला पैसे हवेत. माझी नोकरी नाही. वाराणसीला परत गेल्यावरही पुन्हा नोकरी करता येणार नाही. त्याला बरे करणे हेच ध्येय आहे.
- वरुणा सिंह, यशची आई
|