अलिबाग: सरखेल कान्होजी आंग्रे यांची पावनभूमी म्हणून अलिबागची ओळख आहे. ही नगरी सौंदर्याची खाण आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजही या भूमीत घडले; परंतु "अलिबागसे आया है क्या' असे वाक्य अनेक जण सहज बोलतात. ही थट्टाच आहे. त्यामुळे त्याविरोधात अलिबागकरांनी एकजूट केली आहे. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. आता तर त्यांनी "होय, आम्ही अलिबागवरून आलोय' असे सांगत शहराची अस्मिता जपण्याचा निर्धार केला आहे.
"अलिबाग से आया है क्या' अशा शब्दांचा उपयोग करून अलिबागची थट्टा उडविणे फार चुकीचे आहे. त्याला विरोध आहे. ज्या अर्थाने अलिबागची
बदनामी केली जाते, त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे. अलिबागकर काय आहेत, याची जाणीव या लोकांना झालीच पाहिजे.
- ऍड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्षा, अलिबाग
....................
अलिबागला वेगळा इतिहास आहे. या शहरातून अनेक लढे लढले गेले. चळवळी झाल्या आहेत. त्यातून अन्य जिल्हे, राज्य व देशाने प्रेरणाही घेतली आहे. त्यामुळे "होय, आम्ही अलिबागकर आहोत', असे अभिमानाने सांगण्याची आता वेळ आली आहे.
- ऍड. राकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता
.................
अलिबाग ही कोकणातील सुवर्णभूमी म्हणून ओळखली जाते. अथांग समुद्र, नारळी-पोफळीची झाडे ही अलिबागच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात भरारी घेतल्याने देशात नव्हे, तर जागतिक स्तरावर नाव आहे. आम्हाला अलिबागकर असल्याचा अभिमान आहे. मात्र काही मूठभर मंडळी अलिबागला हिणवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे.
- महेंद्र पाटील, अलिबाग
..................................
अलिबाग ही ऐतिहासिक भूमी आहे. अलिबागचे सरखेल कोन्ही आंग्रे आरमार प्रमुख होते. सांस्कृतिक क्षेत्रात मुग्धा वैशंपायन, देवदत्त नागे यांनी अलिबागच्या लौकिकात भर टाकली आहे. नाटककार, गायक, सिनेअभिनेते अलिबागमधून घडून गेलेले आहेत; मात्र "अलिबाग से आया है क्या' असे विनोदी डायलॉग प्रसिद्ध करून काही मंडळी अलिबागची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
- विक्रांत वार्डे, सामाजिक कार्यकर्ता
|