चेतना तरंग : ईश्‍वराबद्दल ‘जागृत’ व्हा!

ravishankar
ravishankar

प्रथम कोण जागे होते? तुम्ही की देव? तुम्हाला प्रथम जाग येते, तोपर्यंत देव गाढ झोपलेला असतो. तुम्ही जागृत होता तेव्हा आनंद आणि वेदना अनुभवता. सौंदर्याची आणि जगातील त्रुटींची जाणीव तुम्हाला होते. मग तुम्ही परमात्म्याला शोधता तेव्हा तुमच्या मदतीची हाक देवाला जागे करते. देव तुमच्यात जागृत होतो तेव्हा द्वैत राहातच नाही. जगातील प्रत्येक कणात परमेश्‍वर सुप्तावस्थेत आहे. तुमच्यामध्ये परमेश्‍वर बीजरूपात आहे. तो जागृत होतो तेव्हा तुम्ही स्वतःही उरत नाही आणि जगही उरत नाही. देवाला रोज सकाळी जागे करण्याची सार्वजनिक पद्धत ऋषींनी पाडली. ते त्याला सुप्रभातसेवा म्हणतात. बऱ्याच लोकांना हे हास्यास्पद वाटते. कारण त्यांना त्याची महानता ठाऊक नसते. फक्त जागृत देवच पाहू शकतो की सर्वत्र परमेश्‍वर झोपला आहे. या विश्‍वाच्या प्रत्येक कणात ईश्‍वर सुप्त अवस्थेत आहे. तो तुमच्यामध्ये बीजरूपात आहे. तो जेव्हा जागा होतो,

तेव्हा मग ना तुम्ही राहाल, ना हे विश्‍व. कोल्लूर येथील एका पुरातन मंदिराभोवती सजवलेल्या देवीच्या रथाला ओढून नेले जात होते. त्याचे महत्त्व सांगताना मी म्हणालो, ‘‘आपण प्रत्येक जण शक्तीच्या देवतेला वाहून नेणारा एक रथ आहोत. आपण दिव्यत्वाचे खरे रथ आहोत. आपले शरीर म्हणजे रथ आहे आणि आत्मा म्हणजे देवता आहे. जगाच्या शुद्धीकरणासाठी आपल्याला सगळीकडे ओढून नेले जातेय.’’

संरक्षणाचा शाश्‍वत अर्थ...
तात्पुरते, लहान किंवा नाशवंत असेल त्यालाच संरक्षणाची गरज लागते. उलट शाश्‍वत, मोठे किंवा विशाल असणाऱ्या गोष्टीला संरक्षण लागत नाही. तुमच्या शरीराला संरक्षणाची गरज असते; आत्म्याला नाही. तुमच्या मनाला संरक्षणाची गरज असते, स्वत्वाला नाही. संरक्षण याचा सरळ अर्थ, आहे त्या स्थितीत वेळ काढणे, म्हणूनच संरक्षणसुद्धा परिवर्तनाला प्रतिबंध करते. संरक्षणात परिवर्तन होऊ शकत नाही. त्याचवेळेस संरक्षणाशिवाय इच्छित परिवर्तन होऊ शकत नाही. बीजाचे झाडात परिवर्तन होण्यासाठी त्याला संरक्षणाची गरज असते. संरक्षण हे परिवर्तनासाठी पूरक किंवा मारक होऊ शकते. संरक्षणकर्त्याला कोणत्या मर्यादेपर्यंत संरक्षण द्यायचे, याची कल्पना असावी. सत्याला कोणत्याही संरक्षणाची गरज नसते. सुरक्षा आणि परिवर्तन दोन्ही स्थळकाळाच्या मर्यादेत येतात. काळाच्या पलीकडे जाण्यासाठी या नियमांना मान द्यायलाच हवा. आपण सुरक्षित आणि परिवर्तित दोन्ही आहोत. हे हरी आणि हर आहेत. हरी संरक्षक आणि हर परिवर्तक. संरक्षण हे काळाशी, नाशवंत गोष्टींशी मर्यादित आहे. डॉक्टर एखाद्याला किती दिवसात बरा करेल किंवा संरक्षण देईल? कायमचे? नाही. शांती आणि आनंद याला संरक्षणाची गरज लागत नाही, कारण ते तात्पुरते नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com