भोकर : शेतीशिवाराचा पूरता खप्पा बसलाय, रब्बीची आशा मावळली

file photo
file photo

भोकर (जिल्हा नांदेड) : तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक असल्याने बहुतांश शेतकरी निसर्गाच्या पावसावर विसंबून आहेत.यंदा निसर्गाने भरभरून प्रतिसाद दिल्याने शेतीशिवारच नंदनवन झाल होत. नियतीला मात्र हे वैभव पाहवल नाही परतीच्या पावसाने खरिप हंगाची नासाडी झाली. रब्बीची आशा होती ती पण आता मावळली आहे. शेतीशिवारचा पूरता खप्पा बसलाय. बळीराजा जगायचं कसं या चिंतेत घायाळ झाला आहे.

तालुक्यातील पर्जन्यमान हे मागील आठ- दहा वर्षांपासून दोलायमान झाले आहे. त्याचा मोठा फटका शेती व्यवसायाला बसतो आहे. बळीराजाला चारही बाजूने संकटानी विळखा घातला आहे. यातून सहीसलामत सूटका करून घेण्यासाठी केवीलवाणा प्रयत्न सुरू आहे. निसर्ग मात्र आपला जीवघेणा विळखा दिवसेनदिवस अधिकच घट्ट करताना दिसतो आहे. यंदा हवामान विभागाने पाऊस समाधानकारक होणार असल्याचे संकेत दिले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. ते भाकीत तंतोतंत खरं झालं आणि पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यात वरूणराजा अधिकच प्रसन्न झाला.

मूग आणि उडिद पिकांची नासाडी

तालूक्यात खरिपाची पेरणी अगदी वेळेवर झाली. वातावरण पीकासाठी पोषक असल्याने कोवळी पीके वा-यासंग दंगामस्ती करू लागली. पाऊस काही पाठ सोडायला तयार नव्हता. परिणामी मूग आणि उडिद पिकांची नासाडी झाली. दूसरीकडे ब-याच शेतात सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नाही. अशा तक्रारीचा ढिग साचला होता. महागडे बियाणे घेऊन पून्हा पेरणी करावी लागली. पाऊस अधिकच मेहेरबान झाल्याने मनसोक्त बरसत होता. नदीनाले, तलाव तूडूंब भरून वाहत होती. पावसाळा संपल्यावरही परतीच्या पावसाने हाहाकार माजवीला. कूठे ढगफुटी तर कूठे अतिवृष्टीमुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.

रब्बी हंगामातील कामे करता येत नाही

या मुसळधार पावसाने शेताला तळ्याच स्वरूप आलं व सोयाबीन, कापूस, ज्वारी अक्षरशा पाण्यात न्हाऊन निघाली होती. ज्वारीच पिक आडवं पडल्याने कोंब फूटले तर सोयाबीन पिक नासून गेल्याने दूर्गंधी सूटली आहे. कापूस पांढराशुभ्र असला तरी पावसाने भिजून सरकीला मोड आले आहेत. घरातल सारं काही शेतात टाकलं ते मातीमोल झाले आहे. आता घरातही काही नाही व शेतात काही नाही. खरिप पिकाचा पूरता खप्पा बसलाय. रब्बीहंगाम तरी साथ देईल अशी अपेक्षा होती पण शेतात पाणी साचल्याने ते वाळल्या शिवाय रब्बी हंगामातील कामे करता येत नाही. रब्बी लागवड विलंब होणार असल्याने उगवण क्षमता घटणार अशी भीती व्यक्त केली जात आहे. या भयानक संकटात सापडलेला बळीराजा घायाळ झाला आहे. शासनाने या नूकसानीची शहानिशा करून सरसगट नूकसान भरपाई जाहीर करून घायकूतीला आलेल्या बळीराजा दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरते आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com