नांदेड : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून करण्यात येणाऱ्या गव्हाचे वाटप कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी जूनपासून सुरु करण्यात आली आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी झाली आहे. लाभार्थ्यांना गहूचे वाटप कमी केले असले तरी तांदुळाचे वाटप मात्र, शासनाने वाढवून दिले आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्ह्यातील हजारो गोरगरीबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे आहेत.
त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते. सदर धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्त्व आहे.
या धान्य वाटपाचे प्रमाण शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डवर २० किलो गहू व १५ किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळाचे वाटप करण्यात येते. परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बदल केला आहे. त्यानुसार आता लाभार्थ्याच्या हिस्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून त्याबदल्यात लाभार्थ्यांना तितकाच तांदूळ मिळणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.