तरुणांनी मतदारांना दिला तिसरा पर्याय; यंदा प्रथमच अर्धापूरातील मोठ्या गावात तिरंगी लढती

file photo
file photo

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराने गती घेतली असून बहुतांश प्रचाराचे नारळ फुटले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक गावाच्या राजकारणात प्रतिष्ठेची व महत्वाची मानली जाते. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मोठ्या गावात तिरंगी लढती रंगत असून मतदारांसमोर तरूणांनी तिसरा पर्याय ठेवला आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मालेगाव, लहान, येळेगाव, कोंढा, निमगाव,लोण बूद्रुक आदी ग्रामपंचायतची निवडणूक तिन पॅनलमध्ये होत आहे.

तालुक्यात ३७ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रचारने गती घेतली असून प्रत्येक पॅनलने आपला जाहीरनामा घोषित केला आहे. यात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण यावर भर देण्यात आला आहे. सत्ताधारी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा आढवा मतदारांसमोर सादर करीत आहेत. तरी विरोधी पॅनल गावात केलेल्या विकास कामात कसा भ्रष्टाचार झाला आहे यावर भर देतांना दिसून येत आहेत.

तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या दोन पॅनलमध्ये होत असतात, पण यंदाची निवडणूक चित्र काहिसे वेगळेच आहे. लोणी बुद्रूक येथील निवडणूक महेश बुटले व अशोक बुटले यांच्या पॅनलमध्ये होत असे. यंदा विजय भुस्से यांनी मतदारांसमोर प्रथमच तिसरा पर्याय ठेवल्याने निवडणुकीत रंग भरला आहे.

लहान ही तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक आहे. या निवडणुकीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येथील निवडणूक ही संजय देशमुख लहानकर व माजी सरपंच सुधाकर इंगळे यांच्या पॅनलमध्ये रंगत असे. मागच्या वेळेस निवडणुक बिनविरोध झाली होती. यंदाच्या तिरंगी लढतीने तालुक्याचे लक्ष वेधले आहे. यंदा अरुण वानोळे, गजानन कदम, प्रभाकर आंबेकर यांनी मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवून एक नवीन प्रयोग केला आहे.

येळेगाव हे जिल्हा परिषदेचे गट आहे. येथीही तिरंगी लढत होत आहे. माजी सभापती आनंदराव कपाटे यांचा पॅनल, तालुका प्रमुख संतोष कपाटे यांचे पॅनल व सदाशीव कपाटे, कैलास कपाटे यांचे पॅनल अशी तिरंगी लढत होत आहे. यात कोण बाजी मारणार या बाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क काढण्यात येत आहेत.

मालेगाव ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत. या गावात प्रत्येक पक्षातील जिल्हा पातळीवरील नेते राहतात. त्यामुळे हे गाव सतत चर्चेत असते. येथील निवडणूकीचे निकाल जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतो. येथील काॅग्रेसचा एक गट व त्यांना साह्य करणारे ईतर पक्षातील पदाधिकारी एका पॅनलमध्ये तर गेल्या निवडणुकीत सर्वांना धक्का देत गणिमी काव्याने डाॅ लक्ष्मण इंगोले यांनी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आणली होती. यंदाही त्यांचे पॅनल आहे. तर माजी जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले यांनी आपली वेगळी चुल मांडली आहे. तर शेतकरी चळवळीत जिल्हात मोठे योगदान देणा-या कोंढ्यात तिन पॅनल झाले आहेत. यात माजी उपसभापती बालाजी कदम यांचे पॅनल, शेतकरी संघटनेचे एक पॅनल व पप्पु पाटील कोंढेकर यांचे पॅनल अशी तिरंगी लढत होत आहे. तर नव्याने अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्या निमगावात तिन पॅनलमध्ये लढत रंगत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com