आर.के.नगर - ज्येष्ठ नेते ऍड. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पाच वर्षे उलटले तरीही त्यांचे स्मारक अजून ही प्रतिक्षेत आहे. शास्त्रीनगरातील मैदानाच्या कोपऱ्यावरील स्मारक अर्धवट स्थितीतच आहे. 20 फेब्रुवारीला पानसरेंची हत्या होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही याकडे निधी आणि तांत्रिक बाबींचा मुद्दा उपस्थित करून दुर्लक्ष केले जात आहे. 47 लाखांचा खर्च आता 60-65 लाखांपर्यंत पोचला आहे. एकाच वेळी निधी देऊन हे काम पूर्णत्वकडे नेण्याची गरज आहे.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून खून झाला. राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. यानंतर त्यांचे स्मारक शास्त्रीनगर परिसरात उभारण्याचा निर्णय झाला. स्केटिंगच्या मैदानाशेजारीच जागा देण्यात आली. प्रत्यक्षात त्यासाठी पाच लाख रुपयांच्या निधीची तरतूदही झाली. स्मारकासाठी आवश्यक चबुतरा ही उभारण्यात आला. अधिक निधीची आवश्यकता होती. त्यामुळे मेघा पानसरे आणि शिष्टमंडळाने तत्कालीन महापौरांची भेट घेऊन स्मारक पूर्ण करण्याबाबत विनंती केली. तेंव्हा पाच लाखांचा निधी वीस लाखांपर्यंत नेण्यात आला. तो मंजुर ही झाला.
आर्किटेक्ट राजेंद्र सावंत यांनी स्मारकाचा आराखडा तयार केला. त्यानुसार कामसुरू झाले. प्रत्यक्षात काम 40 टक्क्यांपर्यंत पोहचल्यानंतर सध्या ते बकाल अवस्थेत आहे. येथे असलेल्या विजेच्या खांबासह इतर तांत्रिकबाबींचा अडथळा ठरत आहे. परिणामी गेली सहा महिने येथील काम बंद आहे. 47 लाखांचे हे काम होते. प्रत्यक्षात याला तीन वर्षे झाली अद्याप पुर्णत्वाकडे नाही. याबाबतचे इस्टीमेंट आता सुमारे 60-65 लाखांपर्यंत पोचत आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे.
हे पण वाचा - सावधान : फॅशन म्हणून किल्ला भटकंतीस येताय......
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे स्मारकाचा आराखडा तयार झाला तेंव्हा त्याचा खर्च 47 लाख रुपये होता. यावेळी पहिला टप्पा म्हणून पाच लाख रुपये निधी महापालिकेने मंजुर केला होता. त्यानंतर तो पंधरा लाख रुपये मंजुर झाला आहे. आता त्याची निविदा प्रक्रीया सुरू आहे. याला एकाच वेळी निधी देणे आवश्यक आहे.
आर्किटेक्ट राजेंद्र सावंत
निधी आणि इतर तांत्रिकबाबींची पुर्तता करून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचे स्मारक पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे. यापूर्वी केवळ पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. तत्कालीन महापौरांशी चर्चा झाल्यावर पंधरा लाख रुपये वाढविण्यात आला. मात्र यामुळे स्मारक पूर्ण होणार नाही. 20 फेब्रुवारीला हत्येला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. स्मारक पूर्ण होण्यास अजून किती दिवस लागणार ?
- मेघा पानसरे ः स्नुषा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.