अहिल्यादेवींना कोल्हापूरविषयी होता जिव्हाळा

अहिल्यादेवींना कोल्हापूरविषयी होता जिव्हाळा

कोल्हापूर ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर व कोल्हापूर यांचे नाते अतूट आहे. अंबाबाई मंदिराला दिलेली भेट, जोतिबाकडे जाणाऱ्या वाटेवर बांधलेली धर्मशाळा असो, की पट्टणकोडोलीला दिलेली भेट, त्यातून त्यांचा कोल्हापूरविषयीचा जिव्हाळा दिसून येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर त्यांनी केलेल्या कामाचे ऐतिहासिक दाखले त्यांच्या कार्याची आजही साक्ष देतात. 
हातात पिंड घेऊन उभी असलेली राजमाता, असे चित्र डोळ्यांसमोर येते. वास्तविक, त्या देशातील उत्कृष्ट महिला राज्यकर्त्या, प्रशासक व न्यायी होत्या. त्यांनी उत्तम राज्यकारभाराबरोबरच धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धारही केला. अहिल्यादेवी होळकर या इंदूर संस्थानच्या राज्यकर्त्या असल्या तरी त्यांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत सामाजिक कार्य केले. जे भाविक जोतिबाला देवदर्शनासाठी पायी जात होते, त्यांना विसावा मिळावा यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली होती. जागोजागी पाणपोया उभ्या केल्या होत्या. अनेक विहिरी त्यांनी बांधल्या. वडणगे (ता. करवीर) येथील शिव-पार्वती देवालयाजवळ त्यांनी उभारलेली धर्मशाळा आजही सुस्थितीत आहे. 
अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा मोडून काढल्या. त्यांचे पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर त्या सती गेल्या नाहीत. सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतः राज्यकारभार हाती घेतला. मुलींना कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेण्यास बंदी असताना त्यांनी युद्धकला, तलवारबाजी यांचे शास्त्रोक्‍त शिक्षण घेतले. आपली कन्या मुक्ताई हिचा आंतरजातीय विवाह करून दिला. तिच्या विवाहाप्रसंगी त्यांनी एक अट घातली. जो तरुण संस्थानातील दरोडेखोरांचा बीमोड करेल, त्याच्याशी कन्येचा विवाह लावून देऊ, असे त्यांनी जाहीर केले. यशवंतराव फणसे या सैनिकाने दरोडेखोरांना कंठस्नान घातले. त्यानंतर त्याच्याशी आपल्या कन्येचा विवाह अहिल्यादेवी यांनी लावून दिला. त्यासोबत पाच हजार महिलांची सैनिकी फौज तयार करणाऱ्या त्या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. या महिलांना त्यांनी युद्धकलेचे प्रशिक्षण दिले. 
अहिल्यादेवी होळकर या राज्यकर्त्या असल्या तरी त्यांनी आपले संपूर्ण जीवन एका साध्वीप्रमाणे व्यतीत केले. पांढरी साडी, गळ्यात स्फटिकाची माळ व कपाळावर इबितीचा पांढरा टिळा लावून त्या आयुष्यभर राहिल्या. त्यांच्याच कार्यकाळात त्यांनी राजधानी इंदूरहून माहेश्‍वरी येथे हलवली. नर्मदा नदीच्या काठावर कौलारू घरात त्या राहिल्या. न्यायव्यवस्था सांभाळत असताना त्या पांढऱ्या घोंगड्यावर बसून न्यायदान करीत. 

कोट 
अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी धार्मिक स्थळांवर भाविकांना राहण्यासाठी सुविधा केल्या होत्या. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा विवाह होळकर घराण्यात केला होता. त्यामुळे त्यांचे कोल्हापूरशी जवळचे संबंध होते. कोल्हापूरकरांनी त्यांचे विशेष स्मरण करणे आवश्‍यक आहे. त्यांच्या कार्याचा पाठ्यपुस्तकातही समावेश करणे गरजेचे आहे. 
- डॉ. वसंतराव मोरे, हिंदी शिवचरित्रकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com