कोल्हापूर - ई-पासच्या शासकीय ट्रॅकिंग सिस्टीमला चकवा देऊन परजिल्ह्यातील काही व्यक्ती थेट शहरातील लोकांत मिसळत आहेत. यासाठी चुकीचा मोबाइल क्रमांक देणे, चालकाचे नाव आणि पत्ता देऊन ई-पास काढणे, तर काहींकडून मुद्दाम संपर्क टाळण्यासाठी मोबाइल स्वीच ऑफ ठेवले जात आहेत. काही जण थेट दवाखान्यात न जाता घरी जात असल्याचे पुढे आले आहे.
ई-पास घेऊन इतर जिल्ह्यांतील व्यक्ती कोल्हापुरात येतात. त्यांना टोलनाक्यावरच रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. थोड्या वेळानंतर संबंधितांच्या मोबाइलवर संपर्क साधून ते रुग्णालयात पोचले की नाही, याची खात्री केली जाते. मात्र, टोलनाक्यावर नोंद केलेला मोबाइलच चुकीचा वा चालकाचा असतो. तो चालक संबंधित कुटुंबीयांना सोडून जातो. त्यामुळे आलेल्याची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध होत नाही. त्यांच्या पत्त्यावरून चौकशीचा ससेमिरा सुरू होतो. यातून अनेक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
ट्रॅकिंग सिस्टीमशिवाय एक कुटुंबीय थेट कोल्हापुरात आले. शेजाऱ्यांनी विचारणा केल्यावर रुग्णालयात जात असल्याचे सांगितले. रुग्णालयात गेल्यावर १४ दिवस क्वारंटाईन करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित पुन्हा घरी आले आणि पुन्हा गावी निघून गेले. संबंधित अपार्टमेंटमध्ये त्यांच्या नोंदीही घेतल्या नाहीत. वॉर्डमधील सचिवांकडे तक्रार गेल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
संपादन - मतीन शेख
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.