आजरा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात 226.89 हेक्टर पिकाचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक फटका मिरची पिकाला बसला. 145 हेक्टरवरील मिरचीचे तरू पावसाच्या माऱ्याने वाया गेले. यामध्ये बागायत (बहुवर्षीय) पिकापेक्षा जिरायत पिकांचे नुकसान जास्त आहे. तालुक्यातील 1658 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल कृषी विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात, भुईमूग, नागली, मिरची, ऊस, ज्वारी, सोयाबीन, केळीसह अन्य पिकांचे नुकसान झाले. शेतवडीत पाणीच पाणी झाल्याने भात कापणी, भुईमूग काढणी ठप्प झाली. पावसाच्या माऱ्याने भाताने जमिनीवर लोळण घेतल्याने भाताच्या लोंब्या कुजल्या. भुईमुगाच्या शेंगाची पुन्हा उगवण झाली. नागली, ऊस व अन्य पिकांचेही नुकसान झाले.
या पिकांचे पंचनामे शासनाने पंधरा दिवसांत उरकले. यामध्ये तालुक्यात एक हजार 658 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 226.89 हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यात सुमारे 18 लाख 45 हजार 972 रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
यामध्ये मिरची या पिकाचे सर्वाधिक म्हणजे 145.60 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. त्यापाठोपाठ भात पिकाचे 70.15 हेक्टरवरील नुकसान झाले. एकूण नुकसानीमध्ये जिरायत पिकांचे 225.33 हेक्टर नुकसान झाले. बागायत (बहुवर्षीय) पिकाचे 1.57 हेक्टरचे नुकसान झाले. एकूण नुकसानग्रस्त लाभार्थ्यांमध्ये केवळ 8 लाभार्थी हे बागायत पिकाचे आहेत.
दृष्टिक्षेप
- बागायतपेक्षा जिरायत पिकाला सर्वाधिक फटका
- मिरचीच्या तरूचे मोठे नुकसान
- 70.15 हेक्टरला भात पिकाची हानी
- बागायत (बहुवर्षीय) पिकाचे केवळ 1.75 हेक्टरचे नुकसान
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.