नवेखेड (सांगली) - कोरोना विषाणूचा प्रसार व त्यातून झालेली लॉक डाऊन ची परिस्थिती याचा मोठा फटका नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे त्यांनी कुटुंबासाठी बघितलेल्या हिरव्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. इथून पुढे कसे जगायचे ? शेतीला पैसे कुठून आणायचे ? हे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले आहेत.
कृषी-औद्योगिक मध्ये क्रांती करणारा हा सांगली जिल्हा. या जिल्ह्यात झालेली सिंचनाची सोय यातून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा वळलेला कल, त्यातून होणारी अर्थप्राप्ती, त्याद्वारे पाहिलेली स्वप्ने सध्या स्वप्नेच राहिली आहेत. गेली पंधरा दिवस झाले संपूर्ण भारतात लॉक डाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेती मालाला उठाव नाही. मार्केट बंद आहे. पिके तर तोडणीला आली आहेत. गावागावातून विकावे तर ते शक्य नाही कारण रिटेल ला ग्राहक कमी आहे. शेतकऱ्यांना डोके धरून बसायची वेळ आली आहे. महापुरातील सावरलेल्या शेतकऱ्यांनी मिरची, भोपळा, फुले यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या पिकांना चांगला दर मिळतो हा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती निर्माण झाल्याने कृषी कामाची चक्र थांबली. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. कारांडवाडी ता. वाळवा येथील शेतकरी प्रशांत आवटे म्हणाले, अडीच एकर ढोबळी मिरची केली आहे. सध्या साठ दिवस पूर्ण झाले आहेत परिपक्व होऊन तोडणीस सुरुवात केली पण सर्वत्र मार्केट ठप्प आहे. पॅकिंगसाठी लागणारे साहित्य मिळत नाही. माल पडून आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मार्केट ठप्प झाल्यामुळे एवढा माल काय करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. तब्बल पावणे पाच लाख रुपये आज अखेर खर्च केले आहेत. तोडलेली ढोबळी मिरची पोती भरून उसाच्या सरीत उठून त्याचे खत करण्याचे काम नाइलाजाने सुरू करावे लागले आहे.सोन्यासारखा पिकविलेला माल मातीआड करावा लागत आहे.
ग्रेटच : सेवानिवृत्ती मिळाली, तरीही तो म्हणतोय विनामूल्य काम करण्याची संधी द्या...
नवेखेड ता. वाळवा येथील शेतकरी पिंटू नायकवडी म्हणाले 'मी सव्वा एकर क्षेत्रात गलांडा फुलाची चार महिन्यापूर्वी लागवड केली होती. कोल्हापुर मार्केट ला मी थेट जाऊन विक्री करत होतो. चांगले पैसे मिळत होते परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केट ठप्प झालेले अन् माल कुठे न्यायचा हा प्रश्न आहे. आणखी चार लाख रुपये उत्पन्न सहज मिळाले असते पण मन घट्ट करुन सरळ छातीबरोबर वाढलेल्या झाडावर कुऱ्हाड चालवली, जिवापाड जोपासलेली बाग क्षणार्धात कुऱ्हाडीने तोडून टाकली व शेत पुढील पिकासाठी तयार करण्याचे काम सुरू आहे.
राजेंद्र पाटील म्हणाले मी दोन एकरात रताळी हे नगदी पीक घेतल्यानंतर पुन्हा त्या क्षेत्रात भोपळा केला भोपळा काढणी योग्य झाला परंतु मार्केट बंद झाल्याने तो विक्रीसाठी नेऊ शकत नाही. नाईलाजाने मी या पिकावर रोटर फिरवला व पीक जमिनीत गाडले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.