उतूर (कोल्हापूर) - दोन वर्षापूर्वी शेताकडे मशागतीसाठी गेल्यावर त्यांच्या पुढ्यात आकाशातून विज कोसळली, यावेळी ते थोडक्यात बचावले. त्यानंतर काल( गुरुवारी) त्यांना विषारी नागाने दंश केला. यातूनही ते वाचले, केवळ दैव बलवत्तर म्हणून दोनवेळा नैसर्गिक संकटातून वाचलेल्या चव्हाणवाडी (ता.आजरा) येथील ६५वर्षाच्या शेतकऱ्याचे नाव आहे, आत्माराम बाबू गोरे.
याबाबत अधिक माहिती अशी, गोरे हे कामासाठी शेतात गेले होते. काम करीत असताना गवतातून एक काळा नाग आला. पण गोरे यांना तो दिसला नाही. त्याला धक्का बसल्याने त्याने गोरे यांच्या पायाचा चावा घेतला. मात्र यावेळी ते सावध झाल्याने त्यांनी पाय झीडकारुन टाकला. साप बाजूला फेकला. सापाने पुन्हा गोरे यांच्या दिशेने पाहीले व गवतातून निघून गेला. यावेळी गोरे यांची पत्नी त्यांच्या सोबत होती. त्यांनी जवळपासच्या नागरिकांना ही माहीती दिली. नागरिकांनी त्यांना उतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पुढील उपचाराकरीता त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दोन वर्षापूर्वी गोरे एका नैसर्गिक आपतीतून वाचले होते. खरीप हंगामापूर्वी जूनमध्ये ते मशागतीसाठी शेताकडे गेले होते. यावेळी आकाशात ढगांचा आवाज सुरु झाला. वीज चमकायला लागली. हातातील काम सोडून ते घरी परतण्याच्या तयारीत होते. मात्र वाटेतच त्यांच्या समोर वीज पडली. विजेच्या धक्याने ते दुरवर फेकले गेले. यात त्यांना मानसीक धक्का बसला. त्यांच्या परिवाराने त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. उपचारानंतर ते बरे झाले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ते दोन वेळा नैसर्गिक संकटातून वाचले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.