महापुराच्या धास्तीने कोल्हापूरकरांनी आलिशान गाड्या केल्या 'या' ठिकाणी पार्क

Frightened floods people of Kolhapur parked cars on road
Frightened floods people of Kolhapur parked cars on road

कोल्हापूर - पंचगंगेच्या पाण्याची पातळी जशी वाढेल तशी नदीकाठी राहणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांबरोबरच शहरातील रमणमळा, न्यू पॅलेस, महावीर कॉलेज, नागाळा पार्कातील लोकांच्या मनातील धास्ती वाढत आहे. गेल्या वर्षीचा अनुभव पाठीशी असल्याने अनेकांनी आपल्या अपार्टमेंट किंवा घराच्या दारात असलेल्या आलिशान चारचाकी गाड्या अगोदरच रस्त्यावर आणून ठेवल्या आहेत. गेल्यावर्षी अशा गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या या खबरदारीमुळे न्यू पॅलेस ते नागाळा पार्कातील वीज वितरणच्या कार्यालयापर्यंत लावून ठेवलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

गेल्यावर्षी ३१ जुलै रोजी धुवाँधार पावसाला सुरूवात झाली. तीन ऑगस्टपासून पंचंगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली. ४ ऑगस्टला पंचगंगेने धोक्‍याची पातळी ओलांडली तशी नदीकाठच्या गावांतील लोकांच्या मनात धस्स झाले; पण शहरातील लोक मात्र बिनधास्त होते. ‘आमच्या घराजवळ पाणी येतंय होय’ अशा भ्रमात राहिलेल्या लोकांना ७ ऑगस्ट रोजी पंचगंगेने तब्बल ५५ फूट तीन इंच पाण्याची पातळी गाठल्यानंतर मात्र घाम फुटला; पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अनेक अपार्टमेंटमधील वाहने पाण्याखाली गेली होती. तिसऱ्या मजल्यापर्यंतच्या घरातही पाणी घुसले होते. धोका ओळखून अशा लोकांना बाहेर पडण्याचे आवाहन प्रशासन दोन दिवस अगोदरच करत होते; पण त्याकडे दुर्लक्ष करून घरीच बसलेल्या लोकांनी नंतर बाहेर काढण्यासाठी अक्षरशः टाहो फोडला. त्यातूनही काही लोकांना बाहेर काढले; पण लाख मोलाची वाहने मात्र पाण्यातच राहिली. 

यात हजारो दुचाकी आणि शेकडो चारचाकी पाण्यातच राहिल्या. या वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या वर्षीचा हा अनुभव पाठीशी असल्याने आणि गेल्या दोन दिवसांत पंचगंगेच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने लोकांनी गुरूवारपासूनच आपली चारचाकी वाहने अपार्टमेंट व घराच्या दारातून सुरक्षित ठिकाण म्हणून थेट मुख्य रस्त्यावरच आणून पार्किंग केली आहेत. 

स्वतःहून स्थलांतर

केवळ वाहनेच नव्हे तर पाणी घरात घुसण्याची शक्‍यता असलेल्या नागरिकांनी स्वतःहून आवश्‍यक तेवढे साहित्य घेऊन स्थलांतरही केले आहे. उर्वरित साहित्य घरात सुरक्षित ठिकाणी ठेवून या लोकांनी अन्यत्र भाड्याच्या घरात किंवा नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. ऐनवेळी पळापळ नको म्हणून प्रशासनानेही अशा भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देताना बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com