Gram Panchayat Results : भुदरगड तालुक्यात शिवेसेनेची बाजी ; मात्तबरांचा पराभव
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्थानिक आघाड्या होऊनही शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकून ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला. या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेत मजल मारली आहे तर काँग्रेससह भाजपाने काही जागा जिंकून सत्तेत सहभाग मिळविला. शिवसेनेने २१, राष्ट्रवादी १४ तर उर्वरीत स्थानिक आघाड्यांनी १० ग्रामपंचायतीत यश मिळविले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावी शिवसेनेने सत्ता काबीज केली.
येथील मौनी विद्यापीठातील तालुका क्रीडा संकुलात निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात २३ गावांची मतमोजणी झाली. तर दुसर्या टप्प्यात १८ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. ग्रामपंचायतींचे निकाल जसे समजतील तसे विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
खानापूर ग्रामपंचायतीच्या सलग दोन प्रभागात शिवसेनेच्या बी. डी. भोपळे यांच्या आघाडीने ६ जागांवर विजय मिळविला. तर तिसर्या प्रभागातील ३ जागांवर भाजपच्या महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले. म्हसवे येथील तिरंगी लढतीत बिद्रीचे संचालक मधुकर देसाई यांच्या आघाडीने सत्ता कायम राखली. त्यांच्या आघाडीला सात तर विरोधी आघाडीला दोन जागा मिळाल्या.
आदमापुरातील तिरंगी लढतीत बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व विजयराव गुरव यांच्या आघाडीने गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे व बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील यांच्या आघाडीवर मात करून सत्ता प्रस्थापित केली. गंगापूरात हुतात्मा सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, प्रकाश कुलकर्णी, एन. वाय. पाटील यांच्या आघाडीने ७ जागा जिंकल्या तर विरोधी आघाडीचे तानाजी जाधव व अजित जाधव यांना २ जागेवर समाधान मानावे लागले. फणसवाडीत उपसभापती सुनील निंबाळक यांना सत्ता गमवावी लागली. येथे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बाळासो जाधव यांनी सत्ता काबीज केली. मिणचे खुर्द येथे आर. व्ही. देसाई यांच्या आघाडीने सत्ता कायम ठेवून भाजपचे प्रविण नलवडे यांच्या आघाडीला दणका दिला. बसरेवाडीत शिवसेनेचे कल्याण निकम यांच्या आघाडीने सत्ता कायम राखली. तर मोरेवाडीत बिद्रीचे संचालक प्रदीप पाटील व संजय मालंडकर यांच्या आघाडीने सत्ता कायम राखली. नाधवडेत राष्ट्रवादीच्या श्रीमती गीता पाटील व आबासाहेब भोसले यांच्या आघाडीने यश मिळविले.
या निवडणुकीत सर्वाधिक स्थानिक आघाड्या होत्या. स्थानिक नेत्यांनी राजकीय पक्षापेक्षा सोयीची युती करण्यावर अधिक भर दिला होता. मात्र निकालानंतर राजकीय नेत्यांनी सत्तेचे दावे केले. पाचर्डे, पाटगाव, वासनोली व मुरूक्टे या गावांची बिनविरोध निवडणूक झाली होती.
दरम्यान, धनाजीराव खोत यांनी २१ गावात शिवसेनेची निर्विवाद सत्ता असून ३२ ग्रामपंचायतीच्या सत्तेत सहभागी असल्याचा दावा केला. जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसने २६ गावात आणि काँग्रेसचे समन्वयक सचीनदादा घोरपडे यांनी १५ गावात सत्तेत आल्याचा दावा केला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने एकाकी लढत देऊन सत्ता काबीज केली. माजी मंत्री पाटील व आमदार आबिटकरांच्या आघाडीत येथे काटा लढत झाली होती. येथे विजय मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार आबिटकर यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले.
चिठ्ठीद्वारे निवड
भुदरगड तालुक्यात पाच उमेदवारांची समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निवड झाली. सालपेवाडीत दत्तात्रय गोरे, नागणवाडीत सिंधुताई साळवी, तांब्याचीवाडीत प्रकाश परब, मठगाव-मानीत अमोल मेंगाणे तर बेगवडेत स्वप्नील चव्हाण यांची चिठ्ठीवर निवड करण्यात आली.
मात्तबरांचा पराभव
आदमापूर येथे बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे यांच्या आघाडीचा दारूण पराभव करून बाळूमामा देवस्थान समितीचे धैर्यशील भोसले, विजयराव गुरव यांच्या आघाडीने सत्ता काबीज केली. माजी सरपंच विजयराव गुरव व पत्नी सुमन गुरव हे पती, पत्नी याच आघाडीतून विजयी झाले.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.