फोनवर फोन..! ; ‘काय पण करा, मतदानाला तेवढं गावाकडं या’
स्थलांतरित झालेल्या मतदारांची मनधरणी जोरात सुरू झाली आहे.
इचलकरंजी (कोल्हापूर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग रचनेच्या आवाक्यानुसार मतदारसंख्या कमी असते. प्रत्येक उमेदवार एका-एका मतासाठी झगडत असतो. ग्रामीण भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या मतदारांसाठी उमेदवारांचा कस लागला आहे. स्थलांतरित झालेल्या मतदारांची मनधरणी जोरात सुरू झाली आहे. ‘काय पण करा, मतदानाला गावाकडे या,’ अशी उमेदवारांकडून विनवणी सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार प्रत्येक मतदारापर्यंत पोचतात. सर्वसाधारण तीनअंकी मतदारसंख्या असणाऱ्या प्रभागातील उमेदवार मतदारांशी कसून संपर्क साधत आहेत. ग्रामीण भागातील काही नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, नाशिक, पुणे, विदर्भ, मराठवाडा, परराज्यात स्थलांतरित झाले आहेत. प्रत्येक गावातील मतदार मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. अशा स्थलांतरित मतदारांसाठी उमेदवारांनी त्याला गावात आणण्यासाठी तयारी चालवली आहे. याद्या हातात घेऊनच स्थलांतरित मतदारांचा शोध घेत उमेदवार संपर्क साधत आहेत.
हेही वाचा - लेकरांना पाहायला जीव झाला कासावीस
या मतदारांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधत त्यांचे मत मिळविण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. स्थलांतरित मतदारांना त्यांच्या प्रवासाची सोय करण्याबरोबरच बडदास्त ठेवण्यापर्यंत आश्वासन दिले जात आहे. आधीच नव्या वॉर्डरचनेत एकाच गल्लीतील मतदारांची नावे अनेक वॉर्डात विभागल्याने एकगठ्ठा ‘व्होट बॅंक’ विखुरली गेली आहे. यामुळे वॉर्डरचना अस्ताव्यस्त झाल्याने उमेदवारांची पंचाईत झाली आहे. प्रचार करताना उमेदवारांची प्रत्येक मतासाठी धडपड सुरू आहे. प्रभागातील गावात वास्तव्यास असणाऱ्या मतदारांबरोबर स्थलांतरित मतदारांच्या वजनाने आपले पारडे जड करण्यासाठी उमेदवार गुंतले आहेत.
प्रवेशबंदी करणाऱ्यांच्या पायघड्या
गावात कोरोनाकाळात प्रवेशबंदी करणारे आता शहरातील स्थलांतरित मतदारांसाठी पायघड्या घालताना दिसत आहेत. स्थलांतरित मतदारांसाठी उमेदवार फिल्डिंग लावत आहेत.
फोनवर फोन..!
प्रचाराच्या निमित्ताने वारंवार भेटून संपर्क ठेवण्यात उमेदवार पुढे आहेत, तर स्थलांतरित मतदारांशी मोबाईलवर संवाद साधत आहेत. स्थलांतरित मतदारांसाठी ‘फोनवर फोन’ हा प्रचाराचा फंडा उमेदवारांकडून सुरू आहे.
संपादन - स्नेहल कदम