कोल्हापूर : गतवर्षीच्या आठवणी अद्याप ताज्या असतानाच आज कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा महापुराचा विळखा घट्ट होत आहे. राधानगरी धरणाचे काल दोन स्वयंचलित दरवाजे (क्रमांक ३ व ६) सायंकाळी सात वाजता उघडले. दरम्यान राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले त्यामुळे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून एकूण 7112 पाण्याचा विसर्ग होत आहे. चार क्रमांकांचा दरवाजा पहाटे तीन वाजता उघडला असून आता एकूण 6, 3, 4 आणि 5 असे चार दरवाजे उघडले आहेत.
दरम्यान पंचगंगा नदीची पाणीपातळी गेल्या चोवीस तासात केवळ तीन फुटांनी वाढली आहे. काल सकाळी आठ वाजता 41 फूट सात इंच असलेली पंचगंगा आज सकाळी आठ वाजता 44 फूट आठ इंचापर्यंत पोचली आहे. आता राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगा नदीत येणार असल्याने शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरीही शहराला महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
पंचगंगा नदी मध्ये राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी खूप संथ गतीने वाढत असली तरीही आजपर्यंत न सोडलेले राधानगरी धरणाचे पाणी साधारण बारा तासानंतर पंचगंगा नदीत पोचणार आहे. त्यामुळे राधानगरीचे चार दरवाजे उघडल्याने होणारा विसर्ग आता थेट पंचगंगेत येणार आहे. परिणामी शहर परिसरासह नदीकाठच्या गावांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक ठरणार आहे.
राजाराम बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेल्याने त्यावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे वडणगे, केर्ली, केर्लेसह कसबा बावड्यातून औद्योगिक वसाहतीकडे कामाला जाणाऱ्या कामगारांसाठी हा मुख्य मार्ग होता; पण त्यावरही पाणी येऊन वाहतूक बंद झाल्याने या कामगारांसह कारखाना मालकांना आता शिरोली नाक्यामार्गे शिरोली औद्योगिक वसाहतीत जावे लागत आहे.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.