गडहिंग्लज : सर्वांना पाणी मिळण्याच्यादृष्टीने दरवर्षी चित्री प्रकल्पातील पाण्याचे नियोजन केले जाते. गतवर्षीही उत्तम नियोजन केले. परंतु, गडहिंग्लज तालुक्यातील काहींनी बंधाऱ्यातील बरगे काढून पाणी नेण्याचा प्रयत्न केला. आमदारकीचे पहिले वर्ष होते म्हणून संबंधितांना ताकीद देण्याची सूचना प्रशासनाला केली. यावर्षी मात्र अशा पद्धतीने कायदा हातात घेवून फळ्या काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार राजेश पाटील यांनी आज येथे दिला.
येथील पाटबंधारे कार्यालयात चित्री प्रकल्पातील पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. समितीच्या अध्यक्षा तथा कार्यकारी अभियंता स्मिता माने अध्यक्षस्थानी होत्या. आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी चित्रीतील पाणी नियोजनाबाबत सूचना मांडल्या. परंतु आजच्या बैठकीस निमंत्रित असलेले आमदार प्रकाश आबिटकर हे इतर महत्वाच्या कामामुळे अनुपस्थित होते. यामुळे शेतकरी, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांचा अभ्यास करून आमदार आबिटकर यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक लावण्याची सूचना करून आमदार पाटील यांनी केली. मळीमिश्रीत पाणी नदीत सोडणाऱ्या संकेश्वर कारखान्याला नोटीस देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पाटील म्हणाले, ""माणूस आणि राज्या-राज्यातील भेद न मानता पाणी देणारा मी कार्यकर्ता नाही. सीमाभागातील बांधवही आपलेच आहेत. याउलट चित्री प्रकल्पासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांचेही योगदान आहे. त्यांच्यावरही अन्याय होणार नाही याची भूमिका नियोजनावेळी घ्यावी लागेल.''
शाखा अभियंता तुषार पोवार यांनी स्वागत करून चित्री पाणी साठ्याबाबतची माहिती दिली. कार्यकारी अभियंता माने यांनी उपलब्ध पाणी व त्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. आजऱ्याचे सभापती उदयराज पवार, अमर चव्हाण, श्रीरंग चौगुले, विनय सबनीस, उपसरपंच विकास मोकाशी यांनी विविध सूचना मांडल्या. पंचायत समिती सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी, सदस्य बनश्री चौगुले, इंदूबाई नाईक, विद्याधर गुरबे, विजय पाटील, उपअभियंता बाबुराव पाटोळे, शाखा अभियंता एन. डी. मळगेकर आदीसह शेतकरी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
"उपसाबंदी नको'चा सूर
गडहिंग्लज व आजरा या दोन्ही तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधींनी यंदाही उपसाबंदी नकोच असा सूर लावला. काही जण खणदाळपर्यंत, काहींनी निलजी, तर काही जण खोत बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी नको, अशी सूचना मांडली. गतवेळी लाभक्षेत्र असलेल्या निलजी बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी नव्हती. यंदाही पाऊस चांगला झाला आहे. विहिरी, नाले, कुपनलिकांना पाणीच पाणी आहे. यामुळे उपसाबंदी न करण्याच्यादृष्टीने पाणी नियोजन करण्याची मागणी केली. याबाबत आमदार पाटील यांनी सर्व सूचनांचा आढावा घेवून पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेवू असे सांगितले.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.