कोल्हापूर : जिल्हात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीसह गुऱ्हाळ घरांना फटका बसला आहे. साखर कारखान्यांच्या ऊस तोडी काही काळ थांबवाव्या लागल्या आहेत. तर, कारखान्यांकडून आणि गुऱ्हाळ घरासाठी शेतात तोडून ठेवलेला ऊस बाहेर काढता येत नसल्याचे चित्र आहे.
काल सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सायंकाळी जोरदार पावसाने सुरु केली. आज सकाळीही तूरळक पाऊस झाला. यामुळे, जिल्ह्यात सुरु असलेल्या ऊस तोडण्या खोळंबल्या आहेत. तर शेतात तोडून ठेवलेला ऊस शेतात झालेल्या चिखलामुळे बाहेर काढता येत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या माळराना व्यतिरिक्त इतर ऊस तोडणी करता येत नाही. काल झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील गगनबावडा, आजरा, करवीर मधील काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतात ट्रॅक्टर किंवा ट्रॅक घालता येत नाही. उभा ऊस भिजल्यामुळे त्याच्या मोळ्याही बांधता येत नाही. ज्या ठिकाणी केन कटर (ऊस तोडणी मशिन) जाते त्या शेतातही हे अवजड मशीन रुतून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सकाळपासून ऊस तोडणी खोळंबली आहे. यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतातील पाणी कमी होत नाही किंवा ओलही कमी होत नाही. याच परिणाम ऊस तोडणी आणि ओढणीवर झाला आहे. उद्याही जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा - आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी रेंदाळचा पत्रकार गजाआड
गुऱ्हाघरे थंडावली
पावसामुळे गुऱ्हाळ घरांसाठी लागणारे सरपण भिजले आहे. तसेच, ऊस तोडणी पूर्णपणे थांबवावी लागली असल्याने आज दिवसभर गुऱ्हाळ घरांसाठी लागणारी ऊस तोडणी आणि गुऱ्हाळ घरेही बंद ठेवावी लागली आहेत.
साखर कारखान्यांच्या ऊस तोडीवर परिणाम
जिल्ह्यातील 22 हून अधिक साखर कारखान्यांसाठी ऊस तोडणी सुरु आहे. काल दुपारपर्यंत जोमाने सुरु असणारी ऊस तोडणी आज पावसामुळे काही काळ का असेना अडचणीत आली आहे. प्रतिदिन 1 लाख ते सव्वा लाख टन तोडला जाणार ऊस आज मात्र काही हजार टनच तोडला आहे. पावसाचा मोठा परिणाम साखर कारखान्यांच्या ऊस तोडणीवर झाला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.