कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये कोणत्याही घटकाची आर्थिक कुचंबणा होऊ नये, कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये, यादृष्टीने शासनाने प्रथम योजनांची आखणी करावी. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नव्हे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन करणार असल्यास त्यापूर्वी शासनाने सर्व घटकांचा विचार करावा, असे पत्रात म्हटले आहे.
लॉकडाऊनमधील वीजबील, कर आकारणी, कर्जाचे हफ्ते यांचा भार शेतकरी, कामगार, व्यापारीवर्ग व उद्योजक यांना सोसावा लागू नये, यासाठी आधीच धोरण निश्चित करून ते स्पष्ट करावे. या सर्व उपाययोजनांनंतरच लॉकडाऊनचा विचार व्हावा. कडक निर्बंध लावत असताना, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणाऱ्या उद्योगांना, व्यापाऱ्यांना सूट द्यावी व नियम मोडणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी.
बांधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा. तूर्तास लसींचा राखीव साठा न करता सर्वांपर्यंत लस पोचविण्यासाठी प्रायोगिकतेने प्रयत्न करावेत. लस वाया जाण्याचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करून नागरिकांना लस घेण्यास प्रोत्साहीत करावे. लसीकरणानंतरही निश्चिंत न होता प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोचविण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा. लसीकरण केंद्रांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी लसीकरणासाठी विशिष्ट पद्धत राबवावी, असे पत्रात नमूद केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.