मार्गावरील गावांची ठिकाणे सुधारणांची गरज 

Villages on the route need improvement
Villages on the route need improvement

राधानगरी : परिते -गैबी मार्गाची दर्जोन्नती झाली मात्र आता हा मार्ग सुरक्षित राहण्यासाठी रस्त्यालगत व दुतर्फा जवळपास सात मोठी गावे आहेत. येथील चौकात सतत वर्दळ असते. होणाऱ्या वाहतूक कोंडीतून अपघात घडतात. त्या टाळण्यासाठी रस्त्यालगतच्या गावांचे चौक सुधारण्याची उपाययोजना करावी लागणार आहे. गावांना जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरच ग्रामस्थांची ये-जा जीवावर बेतते. यासाठी मार्गावरील गावांच्या ठिकाणी रुंदीकरण, पदपथ, शिवाय रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग गरज आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडील आकडेवारीनुसार जवळपास तीन हजार प्रवासी वाहनाची रोज या मार्गावरून ये-जा असते. वेगाने जाणाऱ्या प्रवासी वाहनांमुळे दुचाकी अपघातांचे प्रमाणही काही वर्षात वाढले आहे. घोटवडेतील स्वयंभू मंदिराजवळ सतत अपघात होतात. 

घोटवडे चौकात आणि कौलव एसटी स्टॅंडवरील सततची वर्दळ ही वाहतुकीसाठी धोक्‍याची ठरते. सिरसे वळण आणि रस्त्यावरच लोकांची वर्दळ, रस्त्याच्या बाजूला लावलेली वाहने धोकादायक ठरतात. आमजाई व्हरवडे येथे धामोड- शिरगावकडून येणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. आवळी बुद्रुक, आणाजे येथेही रस्त्यावर वर्दळ असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होते. झेब्राक्रॉसिंग किंवा स्पीडपट्टी निर्माण करण्याची तसदी बांधकाम विभागाने घेतलेली नाही. खिंडी व्हरवडे येथे राज्य मार्गाला भेदणारा गुडाळ ते आकनूर मार्ग आहे. राज्यमार्ग असला तरी भोगावती ते गैबी विशेषत: खिंडी व्हरवडेपर्यंत अनास्थाच असल्याचे दिसून येते. निपाणी ते गैबी तिट्टापर्यंत मार्गाचे दहा मीटरने रुंदीकरण सुरू आहे. मात्र दाजीपूरपर्यंत रुंदीकरणासाठी तसदी घेतल्याचे दिसत नाही. या मार्गावर वनविभाग आणि अभयारण्य असल्याचे कारण पुढे करून साडेपाच मीटर रुंदीकरणाचा घाट घातला आहे. दुतर्फा दहा मीटरची सार्वजनीक बांधकाम विभागाची मालकी असतानाही वनखाते परवानगी देत नाही, हे कारण सांगितले जाते. वन्यजीव विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगी मागितल्यास वरिष्ठांकडे तो अहवाल पाठवू व मंजुरीनंतर रस्ता रुंदीकरण करता येईल, असा अहवाल दिला होता. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रव्यवहार केलेला नाही.  (समाप्त) 

रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट असे: 
* खिंडी व्हरवडे * आणाजे * आवळी बुद्रुक * आमजाई व्हरवडे * सिरसे *घोटवडे. 

बरगेवाडीं कौलव दरम्यान अरुंद व धोकादायक पुलांच्या ठिकाणी पर्यायी नवीन पूल बांधण्याची योजना नाबार्डमधून मंजूर असल्याने कामाला प्रारंभ होईल. सिरसे पुलाला नव्याने लवकरच रेलिंग करण्यात येईल. घोटवडे स्वयंभूमंदिर आणि ठिकपूर्ली फाटा येथे ब्लॅक स्पॉट करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवला आहे. राज्य मार्गाच्या धोकादायक भागात बॅरियर' साईन बोर्ड आदी साठीचा प्रस्ताव पाठवला आहे. 
- शैलेश मोरस्कर , शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राधानगरी. 

निपाणी -राधानगरी -देवगड राज्य मार्गाची सुधारणा सुरू आहे. मात्र निपाणी- चिकोडी- मुधोळपर्यंत झालेला राज्यमार्ग पाहता त्या दर्जाचा निपाणी- राधानगरी मार्ग होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. वन खात्याकडून परवानगी घ्यावी लागते. यासाठी आळस केल्याने गैबी- राधानगरी - दाजीपूर मार्ग केवळ साडेपाच मीटरने केला जात आहे. 
- डॉ. सुभाष इंगवले, राधानगरी. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com