"झेडपी'त माजी सहकारमंत्र्यांपेक्षा माजी पालकमंत्री वरचढ

"झेडपी'त माजी सहकारमंत्र्यांपेक्षा माजी पालकमंत्री वरचढ

सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या पक्षनेतेपदाचा वाद मागील काही दिवसांपासून सुरु होता. मात्र, त्या वादावर आज पडदा पडला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी पक्षनेतेपदी आनंद तानवडे हेच कायम राहतील. त्यांना त्यांच्या दालनाचा दाबा देण्याबाबतचे पत्र आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. अध्यक्षांनी दिलेल्या या पत्रामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिलेले पत्र बेदखल झाले आहे. 

जिल्हा परिषदेच्या कायद्यात नसलेल्या पक्षनेतेपदावरुन भाजपमध्ये मोठी गटबाजी उफाळली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष पवार यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन पक्षनेतेपदी अण्णाराव बाराचारे यांची नियुक्ती करण्यास सांगितले होते. त्यानुसार श्री. बाराचारे यांनी प्रशासनाकडे दालनाची मागणीही केली होती. प्रशासनानेही बाराचारे यांना दालन दिले होते. मात्र, त्याचवेळी आनंद तानवडे यांनी तक्रार केल्यानंतर एकाच दिवसात बाराचारे यांचे दालन काढून घेण्यात आले. अध्यक्ष कांबळे यांनी भाजप-समविचारी आघाडीच्या पाच नेत्यांना विचारुन पक्षनेतेपद कुणाला द्यायचे हा निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार श्री. कांबळे यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन तानवडे हेच पक्षनेतेपदी कायम राहतील, असे सांगितले आहे. 

श्री. बाराचारे यांनी मागील आठवड्यात पक्षनेतेपदाचा पदभार घेतला होता. त्यावेळी माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांना निमंत्रण देण्यासाठी जिल्हा परिषदेत आले होते. त्यावेळी बाराचारे यांनी देशमुख यांना आपल्या कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी देशमुख यांनी बाराचारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही केला होता. त्यावेळी देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करुन अध्यक्ष पवार यांनी बाराचारे यांची नियुक्ती करण्याचे पत्र अध्यक्षांना दिले होते असे सांगितले. पण, त्याच्या पुढील आठवड्यातच श्री. कांबळे यांनी तानवडे हेच पक्षनेतेपदी कायम राहतील असे सांगितल्यामुळे श्री. देशमुख यांचे वक्तव्य व श्री. पवार यांनी दिलेल्या पत्राला काहीच महत्व नसल्याचे आज सिद्ध झाले आहे. 

माजीमंत्री व जिल्हाध्यक्षांना नाही महत्व 
माजी सहकारमंत्री देशमुख व जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व त्यांचे नेते यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व त्यांच्या नेत्यांचे सख्य असल्यानेच श्री. तानवडे यांचे पद कायम राहिले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भाजपच्या अध्यक्षांनी पत्र देऊनही त्या पत्राला अध्यक्ष कांबळे यांनी नकारघंटा दाखविली आहे. यावरुन जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये माजी सहकारमंत्री व भाजपच्या जिल्हाध्यक्षांना काहीच महत्व नसल्याचे स्पष्ट झाले. जर महत्व असते तर बाराचारे यांचीच निवड कायम राहिली असती. मात्र, जिल्हा परिषदेच्या कुरघोडीच्या राजकारणात माजी पालकमंत्री देशमुख हे माजी सहकारमंत्री देशमुख यांना वरचढ ठरले हे मात्र नक्की. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com