सोलापूर : जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या (बुधवारी) सायंकाळी साडेपाचपर्यंत शेवटची मुदत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून आठ हजार 288 इच्छूकांनी आठ हजार 448 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे आज (ता. 29) एकाच दिवशी सहा हजार 21 उमेदवारांनी अर्ज केले.
तालुकानिहाय उमेदवारी अर्ज (कंसात ग्रामपंचायती)
करमाळा : 51 (603), माढा : 82 (1013), बार्शी : 96 (747), उत्तर सोलापूर : 24 (229), मोहोळ : 76 (1089), पंढरपूर : 72 (1327), माळशिरस : 49 (691), सांगोला : 61 (1070), मंगळवेढा : 23 (277), दक्षिण सोलापूर : 52 (711) आणि अक्कलकोट : 72 (691).
बिनविरोध ग्रामपंचायतींसाठी काही लोकप्रतिनिधींनी बक्षिस जाहीर करुनही ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबरला निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. पहिल्या दिवशी अवघ्या 23 उमेदवारांनी अर्ज केले होते. 24 नोव्हेंबरला तीनशे उमेदवारांचे 309 अर्ज दाखल झाले. त्यानंतर मात्र, तीन दिवस सुट्टी असल्याने 28 आणि 29 डिसेंबरला अर्जाची संख्या वाढली. 28 डिसेंबरला दोन हजार 95 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, मंगळवारी एकाच दिवशी तब्बल पाच हजार 916 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्जांची संख्या वाढल्याने सर्व्हर डाऊन झाला. इंटरनेट स्लो झाल्याने आता ऑफलाइन अज स्वीकारले जाणार आहेत. मोहोळ, पंढरपूर, सांगोला आणि माढा या तीन तालुक्यांतील 291 ग्रामपंचायतींसाठी तब्बल चार हजार 489 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
गावांमध्ये दिसेना महाविकास आघाडी
राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी दिसत नसून प्रत्येकजण आपापल्यापरीने निवडणुकीच्या रिंगणात आपले नशिब आजमावू लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच चुरस पहायला मिळत असून त्यांनी आपापले पॅनल निवडणुकीत उतरविले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.