नीरा पाणी वाटपाच्या वादात मंगळवेढा तालुक्‍याची उडी 

नीरा पाणी वाटपाच्या वादात मंगळवेढा तालुक्‍याची उडी 

मंगळवेढा (जि. सोलापूर) : पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नीरा कालव्याच्या पाणी वाटपाचा वाद सध्या सुरू आहे. यात आता मंगळवेढा तालुक्‍याने उडी घेतली असून नीरा पाणी वाटपामध्ये पूर्वीप्रमाणे मंगळवेढा तालुक्‍याचा समावेश करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 

वीर भाटघर धरणाची निर्मिती मुळातच जत, मंगळवेढा, सांगोला, फलटण या दुष्काळी भागांसाठीच इंग्रजांनी केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर या पाण्याच्या पळवापळवीत मंगळवेढा तालुक्‍याच्या लाभक्षेत्राला वगळून तालुक्‍याचा बळी घेतला. आजही तालुक्‍यातून नीरा उजव्या कालव्याचा नकाशा उपलब्ध आहे. मात्र, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे राजकीय इच्छाशक्ती व सक्षमतेच्याअभावी वीर भाटघरचे हक्काचे पाणी मंगळवेढ्याला मिळाले नाही. तालुक्‍यातील अतितुटीच्या प्रदेशात गणला जातो, असा भाग आजही पाण्यापासून वंचितच आहे. राजकारणात मोठे प्रस्थ असणाऱ्या नेतेमंडळीनी डावा व उजवा कालव्याचे फक्त अस्तरीकरण करण्यास जर पाठबळ दिले तर सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यातील दुष्काळी भाग सिंचनाखाली येऊन या दुष्काळी जनतेचे दारिद्य्र हटविण्याची ताकद वीर भाटघरच्या पाण्यात आहे. मात्र असे होत नाही, ही जनतेची खंत आहे. 

मंगळवेढा तालुक्‍यातील जनतेने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना झाल्यावर 2009 च्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्या वेळी काही नेत्यांनी देखील नीरेचे पाणी मंगळवेढा तालुक्‍याला सहज उपलब्ध होऊ शकते, असा दावा केला होता. श्रमिक मुक्ती दलाचे ऍड. भारत पाटणकर यांनी देखील नीरेच्या खोऱ्यात आणखीन धरणे असून त्यामुळे पाणी मंगळवेढ्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊ शकते, असा दावा करून त्यांनी या भागातील पाणी चळवळीला प्रोत्साहित केले. 
दरम्यान, 2009 पासून नीरेच्या पाण्याचा मुद्दा बंद होऊन तो मंगळवेढा उपसा सिंचन योजना या मुद्द्यावर तरंगत राहिला. याचा प्रस्ताव सध्या शासन दरबारी पडून आहे. 2009 ते 2019 पर्यंत या पाण्याच्या मंजुरीला मुहूर्त मिळाला नाही. यावरून गेली 10 वर्षे तालुक्‍यात राजकारण सुरू आहे. त्यातच आता दोन दिवसांपूर्वी नीरेच्या पाण्याचा मुद्दा राजकीय पटलावर अधिक चर्चेला गेल्यानंतर मंगळवेढेकरांनी देखील मंगळवेढ्याचा समावेश या योजनेत करावा, अशी मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com