म्हसवड-पंढरपूर नव्या राष्ट्रीय महामार्गाला वाखरी परिसरात तडे; संबंधितांवर कारवाईची मागणी 

Haighway Damage
Haighway Damage

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- सातारा या राष्ट्रीय महामार्गाचे दोन वर्षांपासून काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील म्हसवड -पंढरपूर या 60 किलोमीटर महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रडतखडत सुरू आहे. अशातच नव्याने तयार केलेल्या महामार्गाला तडे जाऊ लागले आहेत. वाखरी (ता. पंढरपूर) परिसरात महामार्गाला तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली. काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता खचल्याने कामाच्या दर्जाबाबात देखील प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित बांधकाम कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी केली आहे. 

पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरला देशभरातून लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येतात. पंढरपूरला येणाऱ्या वाहनांची आणि भाविकांची संख्या विचारात घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूरला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. यामध्ये पंढरपूर ते सातारा या मार्गाचाही समावेश आहे. 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली हे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. यामधील म्हसवड (जि. सातारा) ते वाखरी (ता. पंढरपूर) यादरम्यानचे 60 किलोमीटर अंतर रस्त्याचे काम रोडवेज सोल्यूशन या रस्ते बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. 

पंढरपूर तालुक्‍यातील भाळवणी ते वाखरी यादरम्यानचे काम काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु अवघ्या काही महिन्यांतच नव्याने तयार केलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. 
वाखरी परिसरातील राजीव गांधी नगरजवळ 200 मीटर अंतर रस्त्याला तडे गेले असून रस्ता खचू लागला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रस्ता खचून अपघात होण्याची शक्‍यता आहे. या गंभीर बाबीची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दखल घेऊन खचलेला रस्ता पुन्हा नव्याने तयार करावा, अशी मागणी या भागातील नारिकांनी केली आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. संबंधित बांधकाम कंपनीने तयार केलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. 

याबाबत एमएसआरडी, पुणेचे उपअभियंता एम. डी. कजरेकर म्हणाले, नव्याने तयार केलेल्या रस्त्याला तडे जाणे ही गंभीर बाब आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणी जाऊन तातडीने पाहणी केली जाईल. रस्त्याला तडे गेले असल्यास संबंधित बांधकाम कंपनीला नोटीस देण्यात येईल. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे म्हणाले, म्हसवड -पंढरपूर या राष्ट्रीय मार्गाचे वाखरी परिसरात निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. या निकृष्ट कामाची चौकशी करावी, अशी मागणी एमएसआरडीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com