शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटांची मालिका सुरूच ! अवकाळी पावसाचा पुन्हा फटका

Rain
Rain

वाळूज (सोलापूर) : रात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्याबरोबर अचानक आलेल्या पावसामुळे गुरुवारी वाळूज, देगाव (ता. मोहोळ) परिसरात काढणी चालू असलेल्या गहू, हरभरा, ज्वारी ही पिके भिजल्याने व कणसात माती गेल्याने तर द्राक्ष बागेतील घडांत पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपासून शेतऱ्यांसमोर उभी ठाकलेली कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांची मालिका थांबता थांबेना असे झाले आहे. 

बुधवारी (ता. 17) रात्री मोहोळ तालुक्‍यातील वाळूज, देगाव, भैरववाडी, मनगोळी, जाधववस्ती (वाळूज), यल्लमवाडी, बोपले, सय्यद वरवडे, नजीकपिंपरी (ता. मोहोळ) तसेच वाळूज शेजारील साखरेवाडी, शेरेवाडी, भागाईवाडी (ता. उ. सोलापूर) यासह जिल्ह्यात बहुतांश काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. अचानक रात्री आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या आणि काढणी चालू असलेल्या हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा पाऊस पडल्यास काढून टाकलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांचे जास्त नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. यामुळे थंडी गायब झाली असून, किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यात दोन-तीन दिवस गारपिटीसह वादळी पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर ऊन तापल्यानंतर रात्री अचानक वातावरण बदलून मेघगर्जने बरोबरच जोरदार वाऱ्यासह मोहोळ तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. यामुळे पुढील दोन-तीन दिवस हवामान ढगाळ राहणार असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

ग्रामीण कृषी मौसम सेवा, सोलापूर जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ,आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीट होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. 

शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला 
शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकू आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. परिपक्व झालेल्या पिकांची काढणी केलेली असल्यास ताडपत्री किंवा प्लास्टिकच्या सहाय्याने झाकून ठेवावे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com