काशीळ - पिके जगवण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर महावितरण कंपनी मीठ चोळत असून, शेतकरी वर्ग अनामत भरून वीज जोडणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. सध्या जिल्ह्यात १२ हजार २७८ कृषिपंपांची वीजजोडणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध असून पिकांना ते देता येत नसल्याने शेतकरी हतबल दिसून येत आहे.
जिल्ह्यातील महावितरण कंपनीचा विस्कळित कारभार सुरू आहे. वांरवार खंडित होणारी वीज, कमी दाबाने वीजपुरवठा, अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत. जिल्ह्यात कृषिपंप विद्युत जोडणीसाठी सुमारे १५ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते. महावितरण कंपनीने वर्षभरात यापैकी केवळ दोन हजार ३२५ वीजजोडण्या दिलेल्या आहेत. उर्वरित १२ हजार २७८ शेतकरी आजही वीजजोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीसाठी अनामत भरूनही वीजजोडणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. खटाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे दोन हजार ५२६ वीजजोडण्या प्रलंबित आहेत.
सातारा, तसेच दुष्काळी कोरेगाव, फलटण, माण या तालुक्यांत दीड हजारांवर वीजजोडणी प्रकरणे प्रलंबित आहेत. पाणी उपलब्ध असतानाही वीजजोडणी न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत. याबाबत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या खरीप आढावा बैठकीत प्रलंबित वीजतोडणीविषयी चर्चा झाली. मात्र, प्रलंबित जोडण्या कधी मिळणार ? हा प्रश्न कायम आहे. कृषिपंपांचे वीज बिल भरण्यास उशीर झाल्यास वीजतोडणीची कारवाई लगेच केली जाते. मात्र, अनामत रक्कम भरून वर्ष उलटले तरी वीजतोडणी होत नसताना संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुकानिहाय कृषिपंप जोडणी पूर्ण व प्रलंबित
तालुका जोडणी झालेली प्रलंबित जोडणी
सातारा 185 1535
कोरेगाव 207 1938
वाई 236 174
महाबळेश्वर 21 17
जावळी 113 180
कऱ्हाड 532 1311
पाटण 115 561
फलटण 240 1769
खंडाळा 204 469
खटाव 401 2526
माण 71 1798
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.