"घनकचऱ्या'तून 168 टन खत 

"घनकचऱ्या'तून 168 टन खत 

सातारा - जिल्हा परिषदेने हिरीरीने राबविलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला यश मिळू लागले असून, जिल्ह्यातील काही गावांमध्ये या प्रकल्पातून 168 टन खताची निर्मिती झाली आहे. किलोस दहा रुपये याप्रमाणे ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात 17 लाखांची भर पडली आहे. त्याचे व्यवस्थापन होण्यासाठी 223 कर्मचाऱ्यांचीही नियुक्‍ती करण्यात आली आहे. खतनिर्मितीत सातारा व कऱ्हाड तालुक्‍यांनी आघाडी घेतली आहे. 

सातारा जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच घनकचरा व्यवस्थापनासाठी व्यापक प्रमाणात प्रकल्प राबविला आहे. जिल्ह्यातील 223 ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प राबविला आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामपंचायतींनी त्यात आघाडी घेतलेली असून, 55 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींनी 60 टन खत निर्माण केले असून, त्यांना पाच लाख 28 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शिवाय एक हजार 402 लिटर व्हर्मिवशची निर्मिती केलेली आहे. त्यापाठोपाठ सातारा तालुक्‍यातील 31 पैकी 24 ग्रामपंचायतींनी 71 टन खत निर्माण केले. 

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) ठसा उमटविला आहे. शौचालय उभारणी व त्याच्या वापरात देशात तिसरा, "ओडीएफ'मध्ये राज्यात प्रथम, तर स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात तृतीय स्थानावर जिल्हा राहिला. आता या अभियानाचा दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रमातही जिल्हा परिषदेने मजल मारली आहे. डॉ. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, किरण सायमोते यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाला गती मिळत आहे. 

दरम्यान, घनकचरा प्रकल्प राबविण्यात सातारा जिल्ह्याने पुढाकार घेतला असला तरी आता पुढील टप्प्यात सांडपाणी व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे. सध्या नदी, विहिरींतील पाणी दूषित होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, पुनर्वापर होणे अत्यावश्‍यक आहे. जिल्हा परिषदेने त्याकडे लक्ष द्यायला हवे. 

अध्यक्ष, सभापतींचा तालुका मागे 

कोरेगाव, खटाव, महाबळेश्‍वर, पाटणमधील ग्रामपंचायतींनी खतनिर्मिती केली आहे. मात्र, अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचा फलटण तालुका, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांचा जावळी, कृषी सभापती मनोज पवारांचा खंडाळा, वाई तालुक्‍यात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांना गती मिळत नाही. फलटणमध्ये पाच टन, खंडाळ्यात दोन, तर जावळीत अवघे तीन टन खतनिर्मिती झाली आहे. 

घनकचरा प्रकल्पाची सद्य:स्थिती 
निवडलेली गावे : 223, प्रकल्प पूर्ण : 173, प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर : 44, प्रकल्प सुरू नाही : 06

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com