सोलापूर - शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचे अर्ज, तूर-हरभरा पीकपेऱ्याची माहिती, खरीप व रब्बी हंगामांतील विम्याची माहिती ऑनलाइन भरावी लागत आहे. मात्र, ऑनलाइनची पुरेशी जाण नसल्याने 2017 च्या खरीप हंगामात आधार कार्डची जोडणी नसल्याने अथवा बॅंक खाते क्रमांक चुकीचा दिल्याने राज्यातील दोन लाख 49 हजार शेतकऱ्यांचे 19 कोटी 23 लाख रुपये सरकारकडे परत पाठविण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी रब्बी हंगामात पिकांच्या नुकसानीपोटी विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांचा शोध न लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील एक लाख 32 हजार शेतकऱ्यांचे 11 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने सरकारला परत पाठविले होते. त्याचा प्रत्यय 2017 च्या खरीप हंगामाची रक्कम देताना आता पुन्हा येत आहे. विमा उरविल्यानंतर सुमारे 10-11 महिन्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून नुकसानाची रक्कम मिळते. त्यात पुन्हा बॅंकांच्या चुका आणि ऑनलाईन अर्ज भरताना झालेल्या चुकांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. 2018 च्या खरीप हंगामात 15 लाख 39 हजार कर्जदार, तर बिगरकर्जदार 79 लाख 25 हजार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्यांच्यासाठी विमा संरक्षित रक्कम एक हजार 895 कोटी निश्चित करण्यात आली आहे. त्यावर विमा कंपनीकडून काम सुरू असून, जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
2017 ची खरीप स्थिती
89.64 लाख विमा उतरविलेले शेतकरी
1,765 कोटी रु. विमा संरक्षित रक्कम
2.49 लाख शिल्लक शेतकरी
19.23 कोटी रु. शिल्लक रक्कम
ऑनलाइन विमा भरताना आधार लिंक अथवा बॅंक खाते क्रमांक चुकीचा असलेल्या शेतकऱ्यांना रक्कम देणे कठीण होते. परंतु, मागील दोन वर्षांपासून ऑनलाइन विमा भरत असल्याने बॅंक खाते चुकीचे दिलेल्या अथवा आधार लिंक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी गावोगावी शिबिरे घेऊन संबंधितांना रक्कम दिली जाईल.
- विजय घावटे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण (कृषी)
|