कळंबेतील तळ्यात माशांचा मृत्यू; पंचवीस लाखांचे नुकसान

कळंबेतील तळ्यात माशांचा मृत्यू; पंचवीस लाखांचे नुकसान

तारळे : एक जिद्दी माणूस ज्या पठारावर कुसळे उगवत नाहीत, अशा पठारावर शेती करून नानाविध प्रयोग करतो. महाबळेश्वरमध्ये होणारी स्ट्रॉबेरी कळंबेच्या पठारावर घेण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसेच मत्स्यप्रकल्प साकारून तोही यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट घेतो. मात्र, घास तोंडात जाण्यापूर्वीच तो हिरावला गेला. पाणी दूषित झाल्याने तळ्यातील सर्व मासे मृत होऊन विजय पवार या निवृत्त सैनिकाचे सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले.

कळंबे ता. पाटण येथे मागील चार वर्षांपूर्वी विजय पवार यांनी जयजवान जय किसान फार्म उभे केले आहे. विहीर बोअरवेलच्या माध्यमातून त्यांनी शेतीत अनेक प्रयोग करून पठारावर पारंपारिक शेतीला फाटा देत बागायती शेती साकारली. सध्या पाच एकरात आले, एक एकरात पॉलिहाऊस बांधून ढबू मिरचीचे पीक आहे.

तसेच आंबा, नारळ, सुपारी, चिकू दालचिनी अशा विविध प्रकारची पाचशेहून अधिक झाडे लावली आहेत. विहिर व बोअरवेलच्या पाण्यावर ही पिके घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. 
येथे त्यांनी दोन वर्षांपूर्वी 75 बाय 87 मिटरचे दीड एकरात भव्य शेततळे तयार केले. ज्यात तीन कोटी लिटर पाण्याचा साठा होऊ लागला. त्या तळ्यातून पाणी शेतीसाठीही वापरू लागले. या शेत तळ्यात त्यांनी मत्स्य शेतीच्या उद्देशाने गतवर्षी कटला, कॉमन क्राफट, सिल्व्हर, सफर्निस आशा चार प्रकारचे 80000 मत्स्य बीज सोडले होते. त्यासाठी गेल्या सहा महिन्यात साडे पाच लाख खर्च केले.

नुकतेच हे मासे मोठे झाले होते. पाव किलोपासून दीड किलो पर्यंत त्यांची वाढ झाली होती. तळ्यातून काढून मार्केटला विकण्याच्या तयारीत असतानाच दोन दिवसांपूर्वी तळ्यातील पाणी अचानक दूषित होऊन तळ्यातील सर्व मासे मृत झाले. यामुळे विजय पवार यांचे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले. 

तळ्यातील पाणी शेतीला वापरून त्यात बोअरचे पाणी भरत होते. एक दिवसाआड असे करून पाणी फ्रेश ठेवत होते. मात्र गत पंधरा दिवसात कडक उन्हामुळे विहिरी व बोअरवेलचा स्त्रोत कमी झाला. त्यामुळे तळ्यातील पाणी बदलता न आल्याने खाद्य व माशांच्या विष्ठेने पाण्यात रासायनिक अभिक्रिया घडून पाणी दूषित झाले परिणामी मासे मृत झाले. त्यावर उपाययोजना करण्यापूर्वी दोनच दिवसात सर्व तळ्यातील मासे मृत झाल्याने विजय पवार मोठे नुकसान झाले. केवळ पाण्याअभावी ही वेळ मत्स्य प्रकल्पावर आल्याचे दिसून येत आहे. मात्र नुकसान होऊनही मूळच्या सैनिक प्रवृत्तीच्या विजय पवार यांनी यातूनही उभे राहून यशस्वी मत्स्य शेती करण्याची जिद्द दैनिक सकाळशी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com