सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सज्जांची निर्मिती

सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सज्जांची निर्मिती

कऱ्हाड : महसुल विभागातील शेवटचा घटक म्हणजे तलाठी. ३५ वर्षापासुन तलाठी सजांची पुनर्रचनाच झालेली नव्हती. त्यामुळे सजातील गावे जास्त आणि तलाठ्यांची संख्या कमी अशी स्थिती झाली होती. सजे वाढण्यासाठी तलाठी संघाकडुन सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्याची दखल घेवुन शासनाने पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सझे आणि आणि ४६ महसुली मंडळांची नवीन निर्मीती केली आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये आत्तापर्यंत तलाठ्यांचे सज्जे कार्यरत नव्हते. त्यामुळे महसुली कामादरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्याचा विचार करुन शासनाने मुंबईमध्ये पहिल्यांदाच १९ तलाठी सझांची आणि ४ मंडलांची नवनिर्मीती केली आहे. त्यामुळे तलाठी पातळीवरील कामकाज आता मुंबईतही सुरु होणार आहे. 
 
सरकारी काम अन् सहा महिने थांब या उक्तीप्रमाणे महसुल विभागाचे काम सुरु असते अशी सातत्याने चर्चा होते. मात्र त्याला कारणही तसेच आहे. महसुल विभागाकडे असलेली कामे आणि कर्मचारी याचा विचार करता ती म्हण सत्यच ठरत असल्याचे समोर येते. राज्यात तलाठी सजांची पुनर्रचना करुन ते वाढवावी अशी मागणी ३५ वर्षापासुन प्रलंबीत होती. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत होता. अनेक गावातील साताबारांचा मेळ घालता-घालता त्यांच्या नाकीनऊ येत होते. त्याचबरोबर एकीकडे अनेक गावांचा कार्यभार आणि ऑनलाईन सातबाराच्या नोंदणीचे काम यामुळे अनेक गावात तलाठी आण्णासाहेबांची गाठ पडणेही सर्वसामान्यांसाठी मुश्कील बनले होते.

तलाठी संघाकडुन त्यासाठी सातत्याने आंदोलने, पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र शासनाकडुन त्याची दखलच घेतली जात नव्हती. मध्यंतरी तर काम बंद आंदोलन करण्यात आले होते. मात्र सर्व शासकीय कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर शासनाने पुणे आणि कोकण विभागातील सहा जिल्ह्यांसाठी २६९ तलाठी सझे आणि आणि ४६ महसुली मंडळांची निर्मीती केली आहे. त्यामध्ये पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात ३२, सोलापुर जिल्ह्यात ९९, पुणे जिल्ह्यात ८, कोकण विभागातील मुंबईमध्ये १९, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८६ तर रायगड जिल्ह्यात २५ नवीन तलाठी सझे निर्माण करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पुणे विभागात २३ तर कोकण विभागातील संबंधित जिल्ह्यात २३ नवीन महसुल मंडले तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आण्णासाहेब जागेवर नाहीत म्हणुन मारावे लागणारे हेलपाटे थांबण्यास मदत होणार आहे.  

कामाचा ताण होणार कमी 
एका-एका तलाठ्यांकडे तीन ते पाच गावांचा कारभार पाहण्याची जबादारी देण्यात आली होती. त्यातच ऑनलाईन सातबाराचेही काम तलाठ्यांच्या अंगावर होते. त्यामुळे त्यांची पुरती बेजमी झाली होती. मात्र नवीन सझे सुरु होणार असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होवुन कामे झपाट्याने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

शासनाकडुन पुणे आणि कोकण विभागाची चुकीची माहिती शासनाकडे गेली होती. त्यामुळे तेथे निर्माण झालेले सजे आणि आमची मागणी यात तफावत होती. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करुन नवीन तलाठी सझे ३५ वर्षानंतर मंजुर करुन घेतले आहेत. हे आमच्या तलाठी संघाच्या लढ्याचे यश आहे. त्यामुळे उपलब्ध तलाठ्यांवरील कामाचा बोजा कमी होईल. 
- ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, राज्य तलाठी संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com