साखर उद्योगासाठी २७९० कोटींचे पॅकेज

साखर उद्योगासाठी २७९० कोटींचे पॅकेज

कोल्हापूर - अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘बूस्टर डोस’ देण्यासाठी केंद्र सरकारने आज २७९० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. ही रक्‍कम देशातील २६५ साखर कारखान्यांतील इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढवण्याबरोबरच नव्याने इथेनॉल प्रकल्प बसवण्यासाठी बिनव्याजी मिळणार आहे. या कर्जावरील सात टक्‍क्‍याप्रमाणे व्याज सरकार भरणार असून त्यासाठी ५६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

केंद्र सरकारने यापूर्वीच इंधनात दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचा निर्णय घेतला आहे. पण देशांतर्गत आवश्‍यक असलेल्या इथेनॉलचे उत्पादन होत नाही. परिणामी सद्यस्थितीत साखर कारखान्यांकडून केवळ चार टक्केच इथेनॉल इंधनात मिश्रणासाठी उपलब्ध होते. इथेनॉलची आवश्‍यक ती मागणी पूर्ण व्हावी, यासाठी सरकारने इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांकडून प्रस्ताव मागवले होते. देशभरातील सुमारे २६५ कारखान्यांनी हे प्रस्ताव सादर केले होते. त्यात नव्याने इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याबरोबरच आहे त्या प्रकल्पांची क्षमता वाढवणाऱ्या प्रस्तावांचा समावेश आहे. 

आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासाठी २७९० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज व त्यावरील ५६५ कोटी रुपयांच्या व्याज तरतुदीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली. या रक्कमेतून बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते घट्ट स्वरूपात जाळून टाकण्यासाठी आवश्‍यक तो बॉयलरही कारखान्यांना बसवता येणार आहे.

येत्या दोन वर्षांत या निर्णयाचे चांगले परिणाम दिसतील. त्यानंतर इंधन मिश्रणासाठी आवश्‍यक दहा टक्के इथेनॉलची निर्मिती देशात होईल. त्यामुळे यावर खर्च होणारे परदेशी चलनही वाचणार आहे. गेल्या वर्षभरातील साखर उद्योगासाठीचे हे तिसरे पॅकेज आहे. यापूर्वी जून २०१८ मध्ये पाच हजार कोटी तर सप्टेंबर २०१८ मध्ये केंद्राने ५८०० कोटी रुपये या उद्योगासाठी जाहीर केले आहेत. यापैकी बहुतांशी रक्कम कारखान्यांना प्राप्त झाली आहे.

उद्योगासाठी दिलासादायक निर्णय - मेढे
हा निर्णय साखर उद्योगासाठी दिलासादायक आहे. यामुळे इथेनॉलची निर्मिती वाढेल, परिणामी अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. सध्या साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि त्याची ठप्प मागणी, हे उद्योगासमोरची मोठी अडचण आहे. ही अडचण इथेनॉल निर्मितीची क्षमता वाढल्यानंतर कमी होईल, असे मत या उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी व्यक्त केले. 

दृष्टिक्षेपात

  •  देशातील एकूण साखर कारखाने - ५६२
  •  इथेनॉल निर्मिती करणारे कारखाने - १५०
  •  देशातील इथेनॉलची मागणी - ३१३ कोटी लिटर
  •  देशातील सध्याचे इथेनॉल उत्पादन - १६५ कोटी लिटर
  •  इथेनॉलचा सध्याचा दर - ५९.५० रुपये प्रतिलिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com