राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव
सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या राज्यातील तीन लाख 93 हजार शेतकऱ्यांना 387 कोटी रुपयांचे अनुदान आठ दिवसांत मिळणार आहे. पणन विभागाने अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे.
राज्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुतांश शेतकऱ्यांना तूर-हरभऱ्याच्या हमीभावाची रक्कम मिळाली नाही. दुष्काळ अनुदान असो की पीकविमा टप्प्याटप्प्याने दिला जातोय. दरम्यान, कांदा अनुदानाची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत वितरीत करावी, असा प्रस्ताव पणन विभागाने राज्य सरकारला पाठविला आहे. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असून, अनुदानाची रक्कम मंगळवारपर्यंत वितरीत करण्यात येईल, असे पणन विभागातर्फे सांगण्यात आले.
कांदा विक्री केलेल्या राज्यातील 73 बाजार समित्यांमधील सुमारे चार लाख शेतकऱ्यांसाठी 387 कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. आचारसंहिता संपली असून, पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदानाची रक्कम जमा होईल.
- ए. ए. घोलकर, सहसंचालक, पणन
जिल्हानिहाय पात्र शेतकरी व रक्कम
जिल्हा शेतकरी रक्कम
नाशिक 1,91,115 199.57 कोटी
नगर 92,587 73.22 कोटी
पुणे ग्रामीण 32,878 39.26 कोटी
सोलापूर 33,118 36.70 कोटी
धुळे 5,353 5.49 कोटी
जळगाव 3,702 5.00 कोटी
कोल्हापूर 5,302 5.18 कोटी
सांगली 1,912 1.06 कोटी
सातारा 2,638 1.94 कोटी
औरंगाबाद 8,532 5.29 कोटी
बीड 9,573 5.42 कोटी
नागपूर 4,172 5.11 कोटी
अकोला 806 1.02 कोटी
बुलडाणा 372 2.71 कोटी
लातूर 967 1.35 कोटी
रायगड 175 21.97 लाख
जालना 74 81.55 लाख
अमरावती 34 56.22 लाख
उस्मानाबाद 43 7.10 लाख
एकूण 3,93,317 387.30 कोटी
|