नगर - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 500 मीटरपर्यंत असलेली दारूची दुकाने आज बंद करण्यात आली. जिल्ह्यातील 825 पैकी 700 बीअर बार व परमिट रूम बंद झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
मद्यपी चालकांमुळे अपघात वाढल्याने महामार्गालगतची दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. जिल्ह्यात 825 परवानाधारक बार आहेत. त्यापैकी 700 बार राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असल्याने ते बंद करण्यात आले. आता जिल्ह्यात केवळ 125 बारच सुरू आहेत. शहरातील दोन-तीन बार सोडल्यास बाकी सर्व बंद केल्याचे जाधव यांनी सांगितले.
'पांगरमल'मुळे तत्परतेने कारवाई
मद्यपी वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांसह विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही बरीच आहे. पांगरमल येथील बनावट दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक सतर्क दिसून आला. जिल्ह्यात दारूमुळे झालेल्या घटनांमुळे बारवर तत्परतेने कारवाई करण्यात आली.
|