अर्ज भरा.. "एबी' फॉर्मचे नंतर बघू!

अर्ज भरा.. "एबी' फॉर्मचे नंतर बघू!

सातारा - जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. तरीही कोणत्याही पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे तिकीट मिळेल का... या संभ्रमात असलेल्या इच्छुकांची कोंडी झाली आहे. सध्या तरी इच्छुकांना "अर्ज दाखल करा, "एबी' फॉमर्च नंतर बघू' अशी सूचना प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी दिल्या आहेत. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी तसेच एखादा तगडा उमेदवार गळाला लागण्याची शक्‍यता लक्षात घेऊन पक्षांनी ही राजकीय चाल केली आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बंडखोरी होण्याची किंवा दुसऱ्या पक्षात इच्छुक जाण्याच्या भीतीने कोणत्याच पक्षाने आपली उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर केलेली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांमध्ये चांगलीच घालमेल होताना दिसते. उमेदवारी जाहीर झालेली नसल्याने प्रचार कसा करायचा, नेत्यांच्या शब्दावर प्रचार सुरू केला तरी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यास काय? असे अनेक प्रश्‍न इच्छुकांच्या मनात घोळत आहेत. पक्ष सोडताही येत नाही आणि दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळेल याची खात्री नाही, या स्थितीमुळे इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे.

राष्ट्रवादीला बंडखोरीची भीती
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे बंडाखोरी वा पक्ष सोडून इतर पक्षांत जाण्याचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सहा फेब्रुवारीला पक्षातर्फे एबी फॉर्मचे वाटप केले जाणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.

नाराजांवर कॉंग्रेस, भाजपचे लक्ष
कॉंग्रेस, भाजपकडे उमेदवारांची वानवा दिसते. राष्ट्रवादीतील नाराज इच्छुक गळाला लागतील, या आशेने या दोन्ही पक्षांनीही यादी जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब केलेला दिसतो. राष्ट्रवादीतील नाराजांच्या भरवशावर कॉंग्रेस व भाजप या दोन पक्षांतील नेते बसलेत. राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळालेल्या नाराजांना पक्षात घेऊन ऐनवेळी उमेदवारी देण्याची रणनीती या दोन पक्षांनी ठेवलेली दिसते. राष्ट्रवादीने आपले पत्ते ओपन न केल्याने कॉंग्रेस व भाजपचीही कोंडी झाली आहे. भाजप व कॉंग्रेसकडून उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

शिवसेनेचा पदाधिकाऱ्यांवर भर
पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार आहे, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले. या पक्षाकडेही उमेदवारांची वानवा दिसते. शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारीच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. इतर पक्षातून कोणी येऊन उमेदवारी घ्यावी, अशी स्थिती शिवसेनेत नाही. उपलब्ध असेल तेथे उमेदवार देण्यावरच शिवसेनेचे पालकमंत्री विजय शिवतारे व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांनी भर दिला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व शिवसेना अशा चौरंगी लढती पाहायला मिळतील. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारपर्यंत (ता. 6) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com