शेतमालास शीतगृहांची प्रतीक्षाच

Cold-Storage
Cold-Storage

कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये रोज साडेबाराशे टन भाजीपाला, फळांची आवक होते. शेतीमाल साठवणुकीसाठी अवघी चार शीतगृहे आहेत. उर्वरित खासगी शीतगृहे आहेत. त्यामुळे खासगी शीतगृहाचे भाडे व मालवाहतूक परवडत नाही. शासकीय शीतगृहांची संख्या कमी असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना फायदा मिळत नाही. परिणामी रोज जवळपास साडेतीनशे टन शेतमाल परप्रांतात पाठवावा लागतो. दीडशे ते दोनशे टन भाजीपाला नष्ट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या सर्वांवर पर्याय म्हणून कोल्हापूर शेती कृषी उत्पन्न बाजार समिती ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर शीतगृह उभारणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे; मात्र या शीतगृहांचे काम लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्याची गरज आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील बाजारांत राज्यभरातील शेतकरी शेतीमाल घेऊन येतात. यात भाजीपाला व फळांचे प्रमाण लक्षवेधी असते. यात कोल्हापूर बाजार समितीमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास रोज साडेचारशे टन भाजीपाला येतो; मात्र भाजीपाला ज्या दिवशी बाजारात आला, त्या दिवशी जो भाव असेल, तो भाव घेऊन शेतकऱ्यांना परतावे लागते. अशात अनेकदा उत्पादन खर्चाएवढाही भाव मिळत नाही आणि आणलेला भाजीपाला दोन दिवसांनी भाव चांगला मिळेपर्यंत साठवून ठेवण्यास शीतगृहांची व्यवस्था नाही, अशी स्थिती आहे. यावर उपाय म्हणून काही मोजके शेतकरी किंवा खरेदीदार सांगलीतील काही खासगी शीतगृहात शेतीमालाची साठवणूक करतात. 

सांगली जिल्ह्यात जवळपास शंभरावर शीतगृहे आहेत, तर कोल्हापुरात खासगी दोन व पणन विभागाने बांधलेले तळसंदे (ता. हातकणंगले) येथे एक अशी मोजकी शीतगृहे आहेत. अशात सर्वाधिक शेतीमाल कोल्हापुरात येतो. 
फळे हिमाचल प्रदेशातून येतात. त्यांची साठवणूक करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेली शीतगृहे अपुरी पडतात. म्हणून येथील काही घाऊक विक्रेते ती सांगलीतील शीतगृहांकडे पाठवतात. त्यामुळे कोल्हापूर ते सांगली, अशी दोन वेळा फळाची मालवाहतूक करावी लागते. त्याचा चढ-उतार करावा लागतो. यात मालवाहतूक भाडे व घटतूट वाढते. नुकसान सोसण्याची वेळ येते. त्यामुळे कोल्हापुरात शीतगृह लवकर पूर्ण क्षमतेने सुरू झाले, तर त्याचा लाभ होणार आहे.

शेतीमालाच्या साठवणुकीसाठी पणन विभागाच्या मदतीने तळसंदे, आटपाडी  व सातारा येथे एकूण ५  शीतगृहे बांधली आहेत. त्यातून शेतीमाल साठवणूक करण्याची सुविधा झाली आहे. याशिवाय बाजार समित्याही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांच्या स्तरावर शीतगृह उभारत आहेत. यातून भविष्यात चांगली सुविधा तयार होईल.
- सुभाष घुले, पणन विभाग संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com