नगर : कोरोनाची व्याप्ती वाढल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा एक रूग्ण पॉझिटीव्ही सापडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. नगरमध्ये तसेच ग्रामीण भागातील तालुक्यांच्या गावांतही जमावबंदी सुरू केली आहे. पोलिसांनी नगरमधील कापड बाजार तसेच श्रीरामपूर येथील बाजारपेठतील दुकाने बंद करायला लावली. या दोन्ही ठिकाणी मोठी वर्दळ असते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये या पार्श्वभूमीवर त्यांनी ही खबरदारीचा उपाययोजना म्हणून काळजी घेण्यास सुरूवात केली आहे.
अरेरावी केल्यास गुन्हे
गर्दीची ठिकाणी बंद केली जाणार आहेत. लग्न समारंभ, प्रार्थना स्थळांनाही बंदी केलेली आहे. लोकांना बंदचे आवाहन केले जात आहे. अत्यावश्यक सेवांना मात्र त्यातून वगळले आहे. आवाहन करूनही काहीजण दुकाने बंद करीत नाहीत. त्यांना समजपत्र दिले जात आहे. तरीही काहींची अरेरावी सुरू आहे. त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठविलेल्या एकूण 58 जणांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले. त्यात नेवासे तालुक्यातील एक जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दोनवर पोचली आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात 56 जणांना "होम क्वारंटाईन' केले आहे. देखरेखीखाली त्यांना ठेवले आहे. आतापर्यंत 63 जणांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेऊन, नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. प्रशासन व आरोग्य यंत्रणांना सहकार्य करावे. हस्तांदोलन करू नका. हात जोडून नमस्कार करा. स्वच्छतेबाबत काळजी घ्या.''
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ""कोरोनाबाधीत दोन्ही रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये ठेवले आहेत. चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरिया, दुबई, सौदी अरेबिया व अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.''
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, पालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी दत्तात्रेय लांघी, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.
आदेश न पाळल्यास कारवाई
जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, ""नगर जिल्ह्यातील नागरिक व जनता सुज्ञ आहे. कोरोना आजारासंदर्भात प्रत्येकाने जबाबदारी ओळखून योगदान द्यावे, प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंध म्हणून सरकार व प्रशासनाने काही संस्थांना तूर्तास बंद ठेवले आहे. बंद म्हणजे सुट्टी नव्हे, त्यामागचा हेतू लक्षात घेऊन संबंधितांनी फिरणे टाळावे. प्रतिबंधात्मक आदेशाची मुंबई पोलिस अधिनियमानुसार काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित आहे. आदेशाचे पालन केले नाही, तर कारवाई केली जाणार आहे.
खबरदारीच्या उपाययोजना
- श्वसनाचा विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना काळजी घेणे
- हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत
- शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा
- अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये
- फळे, भाज्या न धुता खाऊ नयेत
- हस्तांदोलन टाळावे.
- चेहरा, नाकास वारंवार हाताने स्पर्श करू नये
- गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.