अकलूज - कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना झालीच पाहिजे यासाठी आम्ही चळवळ उभी केली आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी संकल्पित केलेली ही योजना पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला वरदान ठरणार आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी जुलैमध्ये दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलन करणार आहोत, अशी माहिती हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील यांनी दिली.
हिंदुस्थान प्रजा पक्षाची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी कराड ते नृसिंहपूर अशी संघर्ष पदयात्रा सुरू आहे. हिंदुस्थान प्रजा पक्षाचे संस्थापक उदयनाथ महाराज, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे. तिचा समारोप उद्या (ता. 29) नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील नीरा-भिमेच्या संगमावर होणार आहे. या यात्रेचे आज अकलूज शहरात जोरदार स्वागत झाले. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. या वेळी नवनाथ पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. सोलापूर, पुणे सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर या सहा जिल्ह्यांतील 31 तालुक्यांसाठी ही योजना लाभदायी आहे. ही योजना झाली पाहिजे. या मागणीसाठी आमची पदयात्रा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.
|