मंगळवेढा - लोकसंख्येच्या मानाने पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सर्वसामान्यांनीही सत्याच्या मागे राहून पोलिसांच्या कामात मदत करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक मनोजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
येथील पोलिस ठाण्यात आयोजित तक्रार निवारण दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड, महेश विधाते, उपनिरीक्षक शाहूराजे दळवी, दत्तात्रय पुजारी, आदी उपस्थित होते. या तक्रार निवारण बैठकीत दाखल 50 तक्रारीचा निपटारा करण्यात आला.
तत्पुर्वी पोलिस अधीक्षक पाटील यांनी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेत प्रलंबित गुन्ह्याबाबत माहिती घेत दाखल प्रलंबित गुन्ह्याचा वेळेत निपटारा करण्याच्या सुचना दिल्या. नव्याने होत असलेल्या डीवायएसपी कार्यालयाच्या कामासाठी शिल्लक असलेला 18 लाखाचा निधी खर्च करून अपुरी कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. विविध कारणावरून सतत भांडणे करणाऱ्या उपद्रवी वर पोलिसाचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच जनतेच्या सुरक्षता ठेवणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल. लोकसंख्येच्या मानाने गुन्ह्याची संख्या कमी असल्याने सध्या तरी तालुक्यात नवीन पोलिस ठाण्यास मंजुरी मिळाली नाही. सांगोला तालुक्यातील गुन्ह्याची संख्या असल्याने तेथे ज्या ठिकाणी सोयीस्कर आहे तिथे पोलीस ठाणे उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तर वाहतूक पोलिसांची संख्या वाढवाव्या असे सांगून शाळा, कॉलेज ना भेटी, महिला व मुलीची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया पथक कार्यरत ठेवून शाळेच्या वेळात कॉलेज परिसर, स्टँड परिसर पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या तसेच शहरात दोन फिक्स पॉईंट ठेवावेत पोलिस ठाण्यासाठी काही कर्मचारी व एक पोलिस गाडी देण्यात येईल शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्याशी बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश अधिक्षक पाटील यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
पो. नि. प्रभाकर मोरे म्हणाले की, शहराच्या सुरक्षतेच्या दृष्टीने तसेच समाज विघातक प्रवृत्तीला आळा बसावण्यासाठी शहरात मोक्याच्या ठिकाणी तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन असल्याचे सांगून देखभाल दुरुस्तीचा खर्च उचलण्याची जबाबदारी नगरपालिकाने घ्यावी यासाठी नगरपालिकेस पत्र दिले जाणार आहे. शहरात शहा बँकेच्या माध्यमातून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही ची देखभाल अभावी बंद असून तपासाच्या व नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी अॅड. रमेश जोशी यांनी केली. शहरात बाजार दिवशी भुरट्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी सोमनाथ हजारे यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.