सांगलीतील ३२० आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य अधिकारी नियुक्तीस मंजुरी

सांगलीतील ३२० आरोग्य उपकेंद्रांवर आरोग्य अधिकारी नियुक्तीस मंजुरी

सांगली - आयुष्यमान भारत योजनेत जिल्ह्याचा समावेश करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी ताकद लावून या  योजनेत जिल्ह्याचा समावेश करून घेतला आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना आरोग्यवर्धिनी केंद्रांत रूपांतरित करण्यात येणार आहे. त्यात तेरा प्रकारच्या आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ३२० आरोग्य उपकेंद्रांवर कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यास मंजुरी मिळाली आहे. 

जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अवस्था बिकट आहे. आरोग्य केंद्रांत सुविधा आहेत, मात्र वैद्यकीय अधिकारीच नाहीत. जेथे आहेत ते निवासी नाहीत. आरोग्य उपकेंद्रांची स्थिती असून अडचण अन्‌ नसून खोळंबा, अशी झाली आहे. ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यात मनुष्यबळ कमी पडते आहे. त्यामुळे आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यक्रमातून जिल्ह्यातील ३२० केंद्रांवर अकरा महिन्यांच्या कंत्राटी करारावर डॉक्‍टरांची नेमणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यांना सहा ते आठ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षणानंतर सेवानिवृत्ती पूर्व परीक्षा होईल. त्यातून उमेदवार निवडले जातील. त्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ यांच्याकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली  आहे. हे डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य सेवेसह शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवतील. संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, रोगनिदान तपासणी कार्यक्रमही उपकेंद्रातून चालतील. जेणेकरून प्राथमिक आरोग्य सेवेचे विकेंद्रीकरण प्रभावीपणे होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. 

गावातच नोकरी, सेवा
आरोग्य उपकेंद्रांसाठी नेमले जाणारे बीएएमएस आणि बीयूएमएस किंवा बी.एस्सी नर्सिंग झालेले कर्मचारी नेमताना स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. गावातच नोकरी आणि सेवा करण्याची संधी मिळणार आहे. प्रारंभी २५ हजार रुपये दरमहा पगार आणि १५ हजार  रुपयांपर्यंत कामगिरीनुसार भत्ता दिला जाईल. 

जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य सेवा सक्षम होण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. ‘सकाळ’ने आरोग्य केंद्रांच्या स्थितीबद्दल सविस्तर माहिती समोर आणली. त्यात बदलांसाठी नवी योजना उपयुक्त ठरेल. आवश्‍यक मनुष्यबळ मिळेल. आरोग्य सेवा  अधिक दर्जेदार करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत.’’
- संग्रामसिंह देशमुख,
अध्यक्ष, जिल्हा परिषद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com