फलटण शहर - सैन्य दलातील भरतीच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील फलटणच्या धनाजी जाधव याने केलेल्या "कामगिरी'ने माजी सैनिकांच्या जिल्ह्याची प्रतिमेस धक्का लागल्याची प्रतिक्रिया येत असतानाच याप्रकरणी तालुक्यातील इतर तीन संशयितांना ताब्यात घेतल्याने भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची शंका व्यक्त होत आहे.
सैन्य भरतीची प्रश्नप्रत्रिका फुटल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रॅंचने केलेल्या कारवाईमध्ये 20 संशयितांसह 350 विद्यार्थ्यांना अटक झाली आहे. याचवेळी पुणे येथून ताब्यात घेतलेल्या धनाजी जाधव याच्यामुळे फलटण तालुक्यातील इतर सैन्य भरती प्रशिक्षण केंद्रे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहेत. याबाबत अधिक माहिती घेतली असता राजे छत्रपती अकॅडमी हे मध्यवर्ती केंद्र आहे. संगमनेर, बारामती, करमाळा, खानापूर, भोसरी, शिवाजीनगर, चिखली व फलटणमधील सहकाऱ्यांच्या मदतीने शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्याने प्रशिक्षणार्थींकडून मोठ्या प्रमाणात पैशांची हेराफेरी केल्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यात आठपेक्षा जास्त लहान- मोठी सैन्य प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण 350 प्रशिक्षणार्थी भरतीपूर्व तयारी प्रशिक्षण घेताहेत.
त्यासाठी महिन्याकाठी सहा हजार रुपये फी अकारली जाते. बहुतांश विद्यार्थी हे सहामाही, तसेच वर्षभर कालावधीचे प्रशिक्षण घेतात. या काळात शासकीय नोकरीविषयी असलेली तळमळ व आर्थिक कुवतीचा विचार करून संबंधित प्रशिक्षणार्थीस भरतीत पात्र ठरविण्यासाठी कमीतकमी दोन ते सात लाखांपर्यंत रक्कम घेण्यात येते. ही रक्कम चेनच्या माध्यमातून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांपर्यंत गुप्तपणे पोचविण्याचे काम केले जाते. या कामासाठी प्रशिक्षण केंद्रांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असल्याचा अंदाज आहे. तालुक्यातील आठपैंकी किती प्रशिक्षण संस्था वादग्रस्त आहेत, याची चौकशी चालू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या पाठीमागील मुख्य सूत्रधार लवकरच समोर येण्याचे संकेत तपास यंत्रणेकडून देण्यात येत आहेत.
|