यंदा आषाढीला जादा भाविकांना श्री विठ्ठल दर्शन

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी श्रीविठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजा मुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. यंदा या नित्यपूजा दोन दाम्पत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे 45 मिनिटे वेळेची बचत होणार आहे रात्री बारा वाजता बंद होणारी दर्शनरांग यंदा रात्री बारा वाजून 45 मिनिटांपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा सुमारे अडीच ते तीन हजार जादा भाविकांना एकादशी दिवशी श्रीविठ्ठल मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

आषाढी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची पर्वणी साधण्यासाठी लाखो भाविक दर्शनाच्या रांगेत उभे असतात. मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी एका मिनिटात 50 ते 60 तर तासाला जास्तीत जास्त सुमारे साडेतीन हजार भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येते.वर्षानुवर्षे प्रथेप्रमाणे शासकीय महापूजेच्या आधी एकाच दांपत्याच्या हस्ते प्रथम श्री विठ्ठलाची नित्यपुजा आणि ती झाल्यानंतर श्री रुक्मिणी मातेची नित्य पूजा केली जात असे. या पूजा झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते.

यंदा जास्त भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी शासकीय महापूजेच्या आधी श्रीविठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्मिणीची नित्यपूजा करण्याऐवजी वेळेची बचत व्हावी यासाठी दोन दाम्पत्यांच्या हस्ते एकाच वेळी नित्य पूजा केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या श्री होणाऱ्या शासकीय पूजेच्या आधी श्री विठ्ठलाची नित्य आणि पाद्यपूजा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते सपत्नीक तर त्याच वेळी श्री रुक्मिणी मातेची पूजा नगराध्यक्षा साधना भोसले आणि त्यांचे पती नागेश भोसले यांच्या हस्ते केली जाणार आहे.त्यामुळे दर्शनरांग रात्री बारा वाजता बंद न करता ती 12:45 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या वाढीव 45 मिनिटात सुमारे अडीच ते तीन हजार जादा भाविकांना आषाढी एकादशी दिवशीचा श्रीविठ्ठला च्या दर्शनाचा लाभ होणार आहे.

पहाटे सव्वा दोनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरवात होईल.श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची पूजा केल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मंदिरातील सभामंडपात वारकरी प्रतिनिधी आणि निर्मल वारी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. 

हा कार्यक्रम संपेपर्यंत मुख्यमंत्री मंदिरात असल्याने बाहेरील सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. मंदिरालगतच्या रस्त्यावर गर्दी वाढून ढकलाढकली होते.हे लक्षात घेऊन पुढील कार्तिकी यात्रेत पासून वारकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांचा सत्कार समारंभ मंदिरातील सभामंडपात करण्याऐवजी मंदिर समितीने भक्ती मार्गालगत बांधलेल्या भव्य भक्त निवासात करता येईल का याविषयी विचार सुरू आहे.मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून येत्या कार्तिकी यात्रे पासून भक्त निवास मध्ये हा सत्कार समारंभ करण्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती प्रांताधिकारी तथा कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी आज सकाळ शी बोलताना दिली.

मुख्यमंत्री पाचशे मीटर चालणार...
आषाढी एकादशी दिवशी शासकीय महापूजेचे वेळी  वर्षानुवर्षे मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा श्री विठ्ठल मंदिरा पर्यंत येतो. यात्रेतील गर्दीमुळे या वाहनांचा वारकऱ्यांना त्रास होतो.लक्षात घेऊन शिवाजी महाराज चौकापासून श्री विठ्ठल मंदिरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी पायी यावे अशी विनंती आमदार प्रशांत परिचारक यांनी केली होती. त्यानुसार यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराज चौकापासून मंदिरात चालत येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com