राहुरी (नगर) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर क्विंटलला पाचशे ते सातशे रुपये कमी दिल्याने, आज दुपारी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. नंतर संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर तब्बल दोन तास "रास्ता रोको' आंदोलन केले. चर्चेतून तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कांद्याचे लिलाव आज सकाळी सुरू झाले, तेव्हा चांगल्या प्रतीच्या कांद्याला चार ते पाच हजार रुपये क्विंटल भाव अपेक्षित होता. मात्र, काल (सोमवारी) वांबोरी उपबाजारात झालेल्या लिलावांपेक्षा प्रतवारीनुसार पाचशे ते सातशे रुपये कमी भाव निघत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी लिलाव बंद पाडून दुपारी एक वाजता नगर-मनमाड महामार्गावर आंदोलन सुरू केले. तीन वाजेपर्यंत शेतकरी रस्त्यावर बसून होते.
आगामी दोन महिने कांद्याची लाली राहणार कायम...
दरम्यान, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख शेतकऱ्यांसमोर आले. शेतकरी व व्यापारी प्रतिनिधींना बाजार समितीच्या कार्यालयात चर्चेला बोलाविले.
सहायक निबंधक दीपक नागरगोजे, उपसभापती अण्णासाहेब बाचकर, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, संचालक रमेश पवार, कांदाव्यापारी सुरेश बाफना, प्रमोद बजाज, दिलीप चोरडिया, चंद्रकांत पानसंबळ, तुळशीराम कडू, शेतकरी अजय लिप्टे (पढेगाव), भीमाशंकर शिंदे व नारायण गायकवाड (दोघे रा. चांदेगाव), किरण भुसे (केंदळ), किशोर कोहकडे (बारागाव नांदूर), सुनील आढाव (मुसळवाडी) यांनी चर्चेत भाग घेतला.
सरकार कांद्यावर "स्टॉक लिमिट' लावण्याच्या तयारीत
तहसीलदार शेख म्हणाले, ""कर्नाटकातून काल नवीन कांद्याच्या पाचशे ट्रकची आवक झाल्याने दर कमी झाल्याचे "नाफेड'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.'' सभापती तनपुरे म्हणाले, ""मी शेतकरी आहे. आंदोलनाशी सहमत आहे. पंधरा दिवसांत कांद्याचे दर साडेपाच हजार रुपयांपर्यंत वाढले; परंतु मागणी व पुरवठा यावर दराची चढ-उतार ठरते.''
फेरलिलाव होणार नाहीत. ज्या शेतकऱ्यांना दर मान्य नाहीत, त्यांचे लिलाव स्थगित ठेवले जातील. पुढील लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याचे साडेतीन हजार रुपयांच्या पुढे लिलाव होतील, असे चर्चेअंती ठरले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा चार किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या.
|