अंकलखोप - औदुंबर-अंकलखोप (ता. पलूस) येथील सदानंद सहित्य मंडळाच्या शनिवारी (ता. 14) होणाऱ्या 74 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक "पानिपतकार' विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. संमेलनादिवशी सकाळ सत्रातील कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नागाव-निमणी (ता. तासगाव) येथील कवी प्रा. संतोष काळे आहेत.
कवी सुधांशू, म. भा. भोसले व सहकाऱ्यांनी 73 वर्षांपूर्वी येथील वडाच्या झाडाखाली साहित्य संमेलन भरवणे सुरू केले. संमेलनात 73 वर्षांत अनेक नामवंत लेखक, साहित्यिक, कवी, कादंबरीकार, ज्येष्ठ न्यायाधीश, नाटककार, चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी अध्यक्षपद भूषवले. यंदा संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक "पानिपत'कार विश्वास पाटील यांची निवड झाली. कवी प्रा. संतोष काळे यांचा "सूर तुमचे शब्द' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूस येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते निमंत्रित कवी होते. त्यांच्या हस्ते परिसरातील पीएच.डी. प्राप्त महेश पाटील (भिलवडी), शार्दूल जोशी (औदुंबर), दिनार पाटील, सोनम सूर्यवंशी (अंकलखोप) यांचा सन्मान होणार आहे. 2015 चा सुधांशू पुरस्कार राजेंद्र टिके (शिराळा), सुरेश कुलकर्णी पुरस्कार शहनावज मुल्ला (इस्लामपूर), तर सन 2016चा सुधांशू पुरस्कार ओंकार चिटणीस (बोरगाव, ता. इस्लामपूर), तर सुरेश कुलकर्णी पुरस्कार प्रा. विठ्ठल सदामते (रामानंदनगर) यांना जाहीर झाला. पुरस्कारविजेत्यांचा सत्कार संमेलनध्यक्षांच्या हस्ते होणार आहे.
|