सोलापूर - रोस्टरमधील त्रुटी अन् एसईबीसी व केंद्राच्या 10 टक्के आरक्षण अंमलबजावणीच्या घोळामुळे मागासवर्गीय प्रवर्गातील 50 टक्केच रिक्त जागा भराव्यात, अशा सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मागील आठ वर्षांपासून भरतीची प्रतीक्षा असलेल्या राज्यातील सव्वालाख भावी गुरुजींची चिंता आणखीच वाढली आहे.
राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये 10 हजार 361 पदे रिक्त असून काही जिल्ह्यांमध्ये एसईबीसी व खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त नाहीत. केंद्र सरकारने दिलेल्या 10 टक्के आरक्षणाच्या अंमलबजावणीचा पेच कायम आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये रोस्टरचा घोळ आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने अनोखी शक्कल लढवीत मागासवर्गीय प्रवर्गातील 50 टक्के जागा पहिल्या टप्प्यात भराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. ठाणे, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये एकही रिक्त जागा नसल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे आता उर्वरित जिल्ह्यांमध्ये सहा ते सात हजार जागाच भरल्या जातील, या भीतीने डीएड-बीएड स्टुडंट्स असोसिएशनतर्फे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.
टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये पदवीधर व डीएड-बीएड उमेदवारांचा समावेश असल्याने कोणत्या वर्गासाठी कोणत्या उमेदवारांची भरती करायची, याबद्दल स्पष्ट निर्देश नाहीत. तसेच रिक्त पदांची माहिती कोणत्या स्वरूपात पाठवायची, याबद्दलही वरिष्ठ स्तरावरून स्पष्ट सूचना नाहीत. दरम्यान, पहिल्या टप्प्यात मागासवर्गीय प्रवर्गातील 50 टक्केच जागा भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे.
- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
विभागनिहाय रिक्त पदे
कोकण 2,955
पुणे 2,816
नाशिक 1,551
औरंगाबाद 1,605
अमरावती 898
नागपूर 536
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.