उपळाई बुद्रूक, ता. माढा : श्रावण महिन्यात येणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा, वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. या काळात पाऊस झालेला असतो. शेतीत पिके तरारून आलेली असतात. जनावरांना भरपूर चारा उपलब्ध झालेला असतो. या दिवशी बैलांना अंघोळ घालून, लोण्याने त्यांचे खांदे मळून, त्यांना पुरणपोळी भरवून पंचारतीने ओवाळले जाते. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि त्याच्या जनावरांना यंदा या आनंदाला मुकावे लागणार आहे. कारण ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने या भागात पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बैलपोळा छावणीतच साजरा करावा लागणार आहे.
ऑगस्ट महिन्यात बंद करण्याचे नियोजन असलेल्या जिल्ह्यातील चारा छावण्या अद्याप सुरुच आहेत. अजून 263 छावण्या सुरू असून त्या सुरुच ठेवाव्यात, तसेच आणखी छावण्या सुरू कराव्यात, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
अजुन महिनाभर पाऊस पडला नाही तर, जनावरे खाटकाला विकावी लागतील, अशी हताश प्रतिक्रिया माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील चारा छावणीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजा बैलांच्या बैलपोळा सणावर दुष्काळाने विरजण पाडले आहे. उन्हाळ्यापासून घराबाहेर असणारी जनावरे पोळ्याच्या दिवशीही घरी येणार नाहीत. कारण, छावणीत किमान त्यांना पोटापुरता तरी चारा कसाबसा मिऴत आहे. दुष्काळ असला तरी शेतकरी लाडक्या बैलांसाठी ॠण काढुन सण साजरा करतो. परंतु यावर्षी ॠण काढण्याची देखील परिस्थिती राहिलेली नाही.
पाऊस नसल्याने भीषण पाणी, चारा टंचाई निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत सावकारही शेतकऱ्यांना कर्ज देईनासे झाले आहेत. त्यामुळे आपली काळी आई, मुलाबाळांचा भार खांद्यावर घेणाऱ्या सर्जा-राजाचे खांदे पोळ्याच्या दिवशी कसे मळून द्यावेत, याच्या चिंतेत शेतकरी पडला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.