सांगली जिल्ह्याची पाच वर्षाची सरासरी भूजल पातळी 5.61 मीटर आहे. जानेवारी 2021 मध्ये 1.09 मीटरने वाढून ती 4.52 मीटरवर स्थिर झाली. सर्व म्हणजे दहाही तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 2.96 मीटर, तर सर्वात कमी वाढ शिराळा तालुक्यात 0.01 मीटर इतकी आहे. जिल्ह्यात 86 निरीक्षण विहिरींतील भूजल पातळीत सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.
भूजल पातळीच्या नोंदींसाठी 86 निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. जानेवारी 2021 मधील निरीक्षण विहिरीतील पातळीचा पाच वर्षातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात येतो. पर्जन्यमान व निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला असता अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा वाढ दिसून येते. जिल्ह्यात सन 2020-21 साठी संभाव्य टंचाई असलेल्या गावांची संख्या असणारच नाही, अगदी त्याला अपवाद ठरू शकेल, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे देण्यात आली.
यंदा जानेवारी ते जून दरम्यान जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाही. तथापि स्थानिक स्थितीचा विचार करून टंचाईची शक्यता गृहित धरून रोजगार हमी विभागाने गेल्या महिन्यात टॅंकरसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे.
वर्षातून चार वेळा नोंदी
पाणी पातळीतील वाढ किंवा झालेली घट यात अचुकता येण्यासाठी जिल्ह्यातील विहिरींची संख्या दुप्पट केली आहे. त्यांचे मोजपामही तीन वर्षापासून सुरू झाले आहे. पाच वर्षे नियमित मोजणी झाल्यानंतर त्या नोंदींचा विचार केला जाईल. त्यामुळे अचुकता वाढणार आहे. वर्षातून चार वेळा म्हणजे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबरमध्ये पाणीपातळीचे मोजमाप केले जाते.
तालुकानिहाय भूजल पातळीतील वाढ (मीटरमध्ये)
आटपाडी : 1.27, जत : 0.80, क. महांकाळ : 1.14, कडेगाव : 1.07, खानापूर : 0.60, मिरज : 0.75, पलूस : 1.15, शिराळा : 0.01, तासगाव : 2.96, वाळवा : 0.37, एकूण सरासरी : 1.09
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.