बेशिस्त कारभाराला सभासदांची चपराक

बेशिस्त कारभाराला सभासदांची चपराक

‘भोगावती’चे उत्तरायण - मुश्रीफांनी हंटर हातात घेतलाच असता तर...

कोल्हापूर - भोगावती कारखान्याच्या निवडणूक निकालाने सभासदांनी बेशिस्त कारभारालाच चपराक दिली आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कारखान्यात गैरकारभार झाला तर हातात हंटर घेण्याचा इशारा दिला होता. त्याकडे बघून सभासदांनी भरघोस मतांनी सत्ता दिली; पण हीच सत्ता बेकायदेशीर कारभार, अवास्तव नोकरभरतीमुळे राखता आली नाही. श्री. मुश्रीफ यांनी खरोखरच बोलल्याप्रमाणे हंटर नुसता हातात जरी घेतला असता तरी निकालाचे आजचे चित्र वेगळे असते. 

गेल्या निवडणुकीत श्री. मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने ही निवडणूक लढवली. त्या वेळी गैरकारभार करू नका, असा वडीलकीचा सल्ला श्री. मुश्रीफ यांनी दिला होता; पण सत्ता आली की आपण काय करतो, याचे भान राहात नाही. त्याचीच प्रचिती या कारखान्यात सत्ताधाऱ्यांकडून झाली. सत्ताधाऱ्यांच्या कारभारातील उणिवा, गैरकारभार यावर चकार शब्द न काढता नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. दारुण पराभवामागे हेही एक कारण आहे. 

निवडणुकीत दिलेल्या चांगल्या कारभाराच्या आश्‍वासनांची फक्त चर्चाच होत राहिली. उच्चशिक्षित, सुसंस्कृत म्हणून ज्या अध्यक्षांकडून चांगल्या कामाची अपेक्षा होती, त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाला. त्यामुळेच कारखान्याच्या इतिहासात सभासदांनी एकहाती विरोधकांच्या हातात सत्ता दिली. 

राष्ट्रवादीच्या ताब्यात कारखाना आल्यानंतरही तो अडचणीत होता, हे मान्य आहे; पण त्याला सुस्थितीत आणण्याचे वचन श्री. मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी दिले होते. परंतु त्यांनी कारभाराकडे दुर्लक्ष केले आणि आजारी असलेला हा कारखाना ‘व्हेंटिलेटर’वर कधी गेला, हे कळलेच नाही. पॅनेलची बांधणी करण्यापासून राष्ट्रवादीत धुसफूस होती. एवढेच नव्हे तर पॅनेलमधून नाव जाहीर झालेल्या उमेदवारांनी ऐन वेळी माघार घेतली.

त्यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेच नाराज झाले. त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आले; पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. 

दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या नेमक्‍या या त्रुटींवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या उमेदवारांनी हल्ला केला. गैरकारभारापेक्षा कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा त्यांनी शब्द दिला. पी. एन. यांचे नेतृत्व व त्यांची काम करण्याची धमक पाहून सभासदांनी त्यांना सत्ता दिली. आता खरी गरज आहे, ती त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीची! 

‘भोगावती’च्याच एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांनी अडचणीत असलेला सहकार आता आयुर्वेदिक उपचाराशिवाय सुधारणार नाही. त्यासाठी पथ्य, पाणी पाळावे लागेल, असे सांगितले होते. पी. एन. यांनी गुरुस्थानी असलेल्या कै. देशमुख यांचे म्हणणे तंतोतंत मनावर घेतले तर कारखाना पूर्वपदावर येणे अवघड असले तरी अशक्‍य नक्कीच नाही.

पी. एन. यांच्या राजकारणाला उभारी
भोगावती कारखान्यातील निकालाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या राजकारणाला उभारी मिळाली आहे. या निकालाने करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय संदर्भही बदलणार आहेत. एका बाजूला एकटे पी. एन. आणि दुसरीकडे पालकमंत्र्यांसह झाडून सर्वपक्षीय नेते, असे वातावरण असताना त्यांनी एकहाती सत्ता मिळवून आपले राजकीय स्थानही बळकट केले आहे. विधानसभेला अजून दोन वर्षे आहेत. या काळात कारखान्याच्या सभासदांना दिलेला शब्द काही प्रमाणात जरी खरे करण्याच्या प्रयत्न त्यांच्याकडून झाल्यास त्याचा फायदा त्यांना विधानसभेत नक्की होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com