पवारसाहेबांची साताऱ्यातील सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा : उदयनराजे

Udyanraje Bhosale
Udyanraje Bhosale

मसूर : "पवारसाहेब, आमच्याकडून चुका घडल्या असतील; परंतु कधीही कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही,'' अशी टीका भाजप- शिवसेना महायुतीचे लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी केली.

लोकांनी आमच्या सांगण्यावरून घड्याळाला मतदान केले. देशात केवळ चार खासदार निवडून आले बाकीचे पडले. तुमचा पुतण्या असभ्य भाषा करतो आणि तुम्ही त्यावर पांघरूण घालता. राज्य सहकारी बॅंकेत 25 हजार कोटी रुपयांचा गफला होतो आणि तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण करता, यात आमची चूक होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

मसूर येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. सभेस बाजार समितीचे माजी अध्यक्ष हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भीमराव पाटील, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, संपतराव माने, भाजपचे नेते जितेंद्र पवार, सागर शिवदास व नागरिक उपस्थित होते. 
उदयनराजे म्हणाले, "370 कलमाला विरोध करून तुम्ही हुतात्म्यांच्या जखमांवर मीठ चोळले. साताऱ्याचे पाणी बारामतीला वळवले. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पाडले. इतकी वर्षे मराठा आरक्षणाची फरफट केली. तुमच्या माणसांनी भ्रष्टाचार करून राज्य सहकारी बॅंक रसातळाला नेली, यात आमची काय चूक होती. जनतेचे कुठे चुकले याचा जबाब शरद पवार यांनी सर्वांसमोर द्यावा. आम्ही खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणतो. पवारसाहेब, तुम्ही उभे राहणार असाल, तर मी लढत नाही, अशी भूमिका घेतली. तुमच्यासारख्या ज्येष्ठांचा नेहमीच आदर केला आणि यापुढेही करेन. कौरवांची साथ सोडून पांडवांमध्ये सहभागी झालो. लबाडांची साथसंगत सोडली यात आमची काय चूक होती.'' 

धैर्यशील कदम म्हणाले, "राज्यात महायुतीच येणार आहे. त्यामुळे उत्तरमधून महायुतीचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून विधानभवनावर पाठवून परिवर्तनाच्या लाटेत सिंहाचा वाटा उचला. विरोधी उमेदवारांना सत्ता व पैशाची धुंदीत आहे. माझ्यावर ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी मतदारसंघाचा विकास होणार नाही, हे जनता 20 वर्षे पाहात आहे. सातारा तालुक्‍यातील दुष्काळी भाग उरमोडीच्या पाण्यापासून वंचित आहे. तारळी नदीतील पाण्यासाठी पाली व इंदोली उपसा सिंचन योजनेचे हेड 100 मीटर झाले पाहिजे. उरमोडीचे पाणी खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचले पाहिजे. या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तरमधून विधानसभेवर भगवा दिमाखात फडकवावा.'' 

कालची सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा 
साताऱ्यात काल झालेला पाऊस हा शुभशकुन नव्हे, तर त्यांची घाण धुवून टाकण्याचे संकेत आहेत. याची सुरवात सातारा राजधानीत झाली, याचा मला अभिमान आहे. कालची सभा म्हणजे काळूबाळूचा तमाशा होता. ढगाला लागली कळं, राष्ट्रवादीची मतं गळं आणि धनुष्यबाण व कमळ फुलं. राज्याचे दिवाळे निघाले तरी त्यांच्या हाती राज्य सोपवा, असे पवारसाहेब म्हणत असतील तर माझी चूकच आहे. त्यांच्या चुकांचे खापर आमच्या माथी फोडू नका. जनता जनार्दन या सगळ्या चुकांची दुरुस्ती महायुतीच्या बाजूने कौल देऊन करेल, असेही उदयनराजे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com