उंब्रज - भाजपला जातिवादी ठरवून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न अनेक पक्षांकडून सुरू आहे. मात्र, भाजप सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही मतदार भाजपवर विश्वास ठेवून यश देईल, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
ते येथे शेतकरी मेळाव्यात बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, युवा नेते मनोज घोरपडे, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, 'सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय भाजप सरकारने घेतले आहेत. एक एप्रिलनंतर शेतकऱ्यांना ऑनलाईन सात बारा मिळेल. त्यामुळे तलाठ्यांच्या मागे फिरण्याची गरज नाही. भाजपला जातिवादी म्हणणाऱ्यांनी 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्रिपद मिळवले, हे विसरता कामा नये. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली पाहिजे. मनोज घोरपडे यांच्यामुळे पक्षाला उत्तरेत बळ मिळाले आहे.'' या वेळी मनोज घोरपडे, अतुल भोसले, विक्रम पावस्कर, राहुल ढाणे, महादेव साळुंखे, प्रशांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जयवंत जाधव यांनी प्रास्ताविक केले.
उदयनराजे आले तर स्वागतच
सभेनंतर श्री. पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर "उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच आहे. भाजप समविचारी व्यक्तींना बरोबर घेऊन जाण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतो,' असे ते म्हणाले.
|