पाकळ्यांवर ‘विजयाची हळद’

पाकळ्यांवर ‘विजयाची हळद’

सांगली - महापालिकेत शून्यावरून थेट ४१ जागांवर मुसंडी मारणाऱ्या भाजपने अखेर सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेवर कमळ फुलवले. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली भाजपची घोडदौड कायम असून, महापालिका जिंकून भाजपने गोल पूर्ण केला आहे. या विजयाने जिल्हा बॅंक वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपने कब्जा मिळवला आहे. 

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी नावाचे वादळ देशस्तरावर तयार होण्याआधी महापालिकेची २०१३ मध्ये निवडणूक झाली होती. त्या वेळी काँग्रेसने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पुरस्कृत महाआघाडीचा पराभव केला होता. अखेरच्या टप्प्यात महाआघाडीच्या सत्तेचे पुरते बारा वाजले होते. या महाआघाडीत तत्कालीन भाजप आमदार संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील स्वभिमानी आघाडीत भाजपचा सहभाग होता. पुढे पवारांनी भाजपपासून फारकत घेतल्यानंतर महापालिकेत भाजपचे म्हणवले जाणारे तीनच नगरसेवक उरले होते. मात्र, ते चिन्हावर सभागृहात आले नसल्याने गेल्या सभागृहात भाजपचे शून्यच स्थान होते. त्यामुळे भाजपचा आजचा विजय शून्यावरून थेट ४१ जागांवर म्हटला पाहिजे. लोकसभा निवडणूक झाली आणि जिल्ह्यात लोकसभा, पुढे विधानसभेला चार आमदार, त्यानंतर पाच पंचायत समित्या, जिल्हा परिषद असे सत्तेचे सोपान भाजप चढतच राहिला. आता महापालिकेतील विजयाने जणू सत्तेचे वर्तुळ पूर्ण झाले. आजघडीला दोन आमदार, मिरज पंचायत समिती आणि आता तीन शहरांची महापालिका अशी निर्विवाद भाजपची सत्ता महापालिका क्षेत्रात आली आहे. ही सर्व सत्तांतरे स्वातंत्र्यानंतर प्रथमच झाली म्हटली तर चुकीचे ठरणार नाही. 

ज्येष्ठ नेते वसंतदादा, विष्णूअण्णा, मदन पाटील, पतंगराव कदम, प्रकाशबापू पाटील, जयंतराव पाटील, आर. आर. पाटील या काँग्रेसी विचारधारेतील नेत्यांचेच जिल्ह्यावर वर्चस्व राहिले. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये ‘आउट गोइंग’ सुरू झाले. महापालिकेतील विजयाने शेवटचा गडही ढासळला. जिल्हा बॅंक सोडली तर दोन्ही काँग्रेसकडे आज जिल्हास्तरावरील कोणतेही महत्त्वाचे सत्ताकेंद्र राहिलेले नाही. महापालिकेतील सत्तांतराची चाहूल जयंत पाटील यांना बहुदा लागली होती. त्यामुळेच त्यांनी काँग्रेससोबत आघाडी केली. त्यानंतर पहिल्या फळीतील कार्यकर्ते भाजपला मिळणार नाहीत याची दक्षताही त्यांनी घेतली. त्यामुळेच कुपवाड आणि मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत टळले. मात्र सांगलीत गावभाग, वखारभाग, खणभाग, विश्रामबाग येथे भाजपने मुसंडी मारली. 

जयंत पाटील यांचे प्रयत्न
जयंत पाटील यांनी काँग्रेस आघाडी सावरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस नेते जयश्री पाटील, विश्‍वजित कदम, विशाल पाटील, प्रतीक पाटील या नेते मंडळींनी या निवडणुकीत स्थानिक पातळीवर नेतृत्व केले; मात्र या सर्व नेतेमंडळींना एकसंध असे नेतृत्व देण्यात अपयशच आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com